Bookstruck

गोड निबंध - २ 73

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ज्या खैंबर खिंडीतून जुन्या काळीं परकी पारतंत्र्याचा हल्ला आला त्याच खिंडींतून आज देशभक्तीचा लोंढा येत आहे.  १७ हजार पठाण १९३० च्या लढयांत मिळाले.  ते कां?  सत्याग्रहानें स्वराज्य कां मिळाले नाहीं म्हणून कांहीजण विचारतील.  पण अंब्याच्या झाडाची कोय लावून लगेच फळें येत नाहींत.  ३५ कोटींच्या राष्ट्रालाहि तसाच कालावधि, झगड्यामागून झकडे करावे लागायचेच.

आज तुम्हीं मिरवणुकींतून सारेजण ' इन्किलाब झिंदाबाद भारतमें सैतानी राज, नामंजूर है हमको आज ' असें क्रांतिगीत गात आलांत - हेंच गीत गात तुम्हीं खेडयापाडयांत जा, खेडयांतील जनतेला भडकवा, भिंती रंगवा, एकहि भिंत रिकामी ठेवू नका कीं, जिच्यावर ब्रिटिश साम्राज्यशाहीचा नायनाट करा ; हिंदी संपूर्ण स्वातंत्र्याचा विजय असो असें लिहिलेलें नाहीं.  चीनमधील विद्यार्थांनी काय केलें?  त्यांनी खेडयातील जनतेसाठीं नाटयप्रयोग वगैरे कसले बसविले, त्याची माहिती करून घ्या आणि निदान दर रविवारीं तरी खेडयांत जा.  आतां बारीकसारीक मतभेद विसरा.

खेडयांतील निरक्षरता, अज्ञान, पिळवणूक, दारिद्रय, दैन्य हातीं घेऊन तो प्रश्न धसास लावण्यासाठीं आतां विद्यार्थी संघ घसरावला पाहिजे-जगाचे चाक फिरत आहे.  त्यांतून सुंदर समाजरचनेचें भांडे तयार होईल.  गेल्या महायुध्दांतून रशिया निघाला ;आतांचे महायुध्दांतून हिंदुस्थान निघेल! सर्व जगाला प्रचंड आदर्श निर्माण होईल.  याच क्रान्तिकारक कामासाठीं झटा  तुमची परिषद यशस्वी होवों.  नवी दृष्टी, नवा महाराष्ट्र, नवा हिंदुस्थान, नवें जग डोळयांपुढें ठेवा.  नवी समाजरचना निर्माण करण्यांसाठींच जगा.  स्वातंत्र्याच्या नवीन लढयांत तुम्हीं संपूर्ण भाग घेऊन त्याला प्रचंड यश मिळवून द्याल अशीच माझी श्रध्दा आहे.  वंदे मातरम्!

-- वर्ष २, अंक ३२

« PreviousChapter ListNext »