Bookstruck

सर्पमित्र

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
मी एकटा.. छाती थोडी फुलून आली. इतक्यात त्यांच्यातील एक जण लांबूनच ओरडला.

"हे सोडू नका त्याला. संपवा."

मी त्याच्याकडे पाहत मनात म्हटलं

'स्वतः कोसभर दूर उभा राहून आदेश कसले देतोस दम आहे तर समोर ये ना'

त्यातल्या एकाने माझ्यावर काठी उगारताच दुसरा म्हणाला

"मारू नका . मी पाहतो."

त्याचे शब्द ऐकून थोडं बरं वाटलं. कुठतरी दया, करूणा आहे. पण माझं लक्ष नसताना त्याने माझी मान पकडुन चक्क मला वर उचलला.

मला मानेची हालचाल करता येईनाशी झाली. तसा मी जोराचा हिजडा मारला आणि त्याच्या पकडीतून निसटून जमिनीवर आदळलो.. मला आता काही सुचेनासे झाले. जीव वाचवण्यासाठी मी सैरावैरा धावू लागलो आणि एकच कल्लोळ, गदारोळ माजला.

मला मारण्यासाठी इथे जमलेले आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वाट दिसेल तिकडे पळत सुटले होते. त्यातला एकजण शेजारच्या काटेरी कुंपणात पडला तर दोघे गटारीत कोसळले. पण मघापासून 'हिरोगिरी' , हिरोपंती करणारे मात्र कुठे गायब झाले ते मला शेवटपर्यंत समजलं नाही. बाकीचे रस्ता दिसेल तिकडे उड्या मारत नुसत पळत होते. इतक्यात त्यातला एक जण ओरडला.

"अरे मारू नका त्याला. सर्पमित्र आलाय"

हे शब्द कानावर पडताच मनाला थोडा धीर आला. जागेवरच थांबलो आणि माझा कोण मित्र आहे पाहू लागलो. घोणस, मण्यार, धामण यांच्या पैकी कोणीतरी असेल तोच आणखी कोणीतरी ओरडलं "पकडू नका.. मारून टाका त्याला.. 'नाग' आहे तो.."

"मारू नका. मी सर्पमित्र आहे. त्याला पकडून दूर सोडून येतो."

मला संजीवनी देणारे हे शब्द बोलत एक माणूस पुढे आला. त्याच्या हातातील ती विचित्र काठी . विचित्रच पेहरावा. त्याला खालून वर नीट पाहत मनात म्हणालो.

"अरे हा माझा मित्र कधी कधीपासून झाला.? तसे फेसबुक वर कधी न पाहिलेले पण आपले मित्र असतात पण आम्हा सर्पांमधे फेसबुक व्हाट्सअप किंवा सोशल मीडियाची सुविधा नाही.. त्याचं बोलणं संपताच मी सैरावैरा धावू लागलो. धावतच मनाला म्हणालो.

" हा माझा मित्र..? कोणत्या बाजूने , कोणत्या अँगलने हा माझा मित्र वाटतो..?"

तोच कुणीतरी काठी भिरकावली आणि जाता जाता ती माझ्या पाठीत बसलीच. जोरात कळ उठली, पण न थांबता तसाच धावत सुटलो. म्हटलं आधी सुरक्षित जागी पोहोचू, मग काय आणि किती लागलय यावर विचार करू. शेवटी एका सुरक्षित जागी पोहोचलो पण ते सर्व बाहेर ठाण मांडून बसले होते . या सर्व गोंधळात ती म्हणजे 'बेडकी' पळून जाण्यात यशस्वी झाली. रात्र झाली तशी बाहेर सुरू असलेली चर्चा ऐकू येऊ लागली. एक जण म्हणाला,

" आज ती बेडकी आमच्या मुळे वाचली."

पण हे सांगताना समोर ठेवलेली कोंबडीच 'चिकन ६५' मात्र अधाशासारखा खात होता. पण त्यात एक जण जे बोलला त्याचा खूप राग आला.

"आमच्या घरात आज 'साप' आला होता."

मनात म्हटलं, 'अरे मुर्खा मी तुमच्या घरात नाही तर मी माझ्या घरात आला आहात.' या ठिकाणी भल मोठ जंगल आणि माझ छोटस वारूळ होतं. ते उद्ध्वस्त करून तुम्ही तुमची घरे बांधली आहेत. आम्ही छोट्या छोट्या जीवांनी जायचं तरी कुठे, आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी काल पासून ह्या जागेवर अडकून पडलोय. पोटात भूक आहे पण बाहेर गेलो आणि त्यांच्या नजरेस पडलो तर सगळं संपलं म्हणायचं. जिथे पहावं तिथे माणसांचा अतिक्रमण झालय . आमच्यासारख्या जीवां ची घर नष्ट करून आपली वस्ती वाढवत आहेत आणि वर आम्हालाच 'घुसखोर' ठरवून ठेचत आहेत. पण एक दिवस असा येईल की येणाऱ्या पिढीला पशु, पक्षी , प्राणी असे दिसायचे हे चित्रामधेच दाखवावे लागेल. कारण प्रत्यक्षात आमच्यासारख्या सजीवांचं अस्तित्व स्वार्थी माणसाने संपवल असेल.

आशा करतो की सुरुवातीला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. चला. पहातो काही खायला भेटत का ते..

समाप्त.

मित्रांनो अवनी वाघिणीच्या हत्येमुळे पुन्हा एकदा वन्यजीवांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
‘रेड लिस्ट’चा आढावा घेतला तर असे दिसून येते की सन २०१४-१५ पर्यंत जगातून ७८ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, २१ सरपटणारे प्राणी, ३३ उभयचर, १४० प्रकारचे पक्षी व ६४ प्रजातींचे मासे कायमचे नष्ट झाले आहेत, पुन्हा कधीच न दिसण्यासाठी. अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांतीमधून निसर्गतः निर्माण झालेल्या जीवसृष्टीमधून ३३७ प्राणी नामशेष झाले आहेत., आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या मागणीमुळे प्राण्यांची बेकायदेशीर शिकार, तस्करी तसेच दिवसेंदिवस पोखरत असलेल्या जंगलामुळे जंगलातील प्राणी आता मनुष्यवस्ती शिरकाव करत आहेत.आणि हे जर असेच राहिले तर पृथ्वीवर केवळ माणूसच माणूस राहील आणि एक दिवस असा येईल की जसे डायनासोर या पृथ्वीवर नष्ट झाले तर माणसाचा अंत होईल

धन्यवाद...#285327351
« PreviousChapter ListNext »