Bookstruck

मोहनगाव 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सुंदरपूरच्या मित्रांना आमंत्रणे गेली. कामगारांच्या युनियनमार्फत कामगारांना, विद्यार्थ्यांच्या संघटनेमार्फत विद्यार्थ्यांना पत्रे गेली. सुंदरदास शेठजींनाही आमंत्रण पाठवण्यात आले. आणि आश्चर्य हे की – मी येतो म्हणून त्यांचे पत्र आले! रामदासने सेवा दलाचे पथक उभारले. पाहुण्यांसाठी छोट्यामोठ्या झोपड्या बांधण्यात आल्या. सर्वत्र आनंद होता. प्रसन्नता होती. आणि दिवस आला. सुंदरदास आले. जयप्रकाश नि प्रभावतीदेवी दोघे आली. त्यांचे थाटाने स्वागत करण्यात आले. अमरनाथ आला होता. त्याने जयप्रकाशांना सारे नीट दाखवले. पुढच्या योजना निवेदिल्या. सुंदरदासही सारे बघत होते.

मुस्लिम निर्वासितांची गोष्ट त्यांना सांगण्यात आली.

“येथे सारे मानव म्हणून नांदत आहेत. मुसलमान असोत की इतर कोणी—आपण आधी मानव आहोत, ही गोष्ट सारे ओळखतात. आकाशाचा घुमट ज्याला आहे अशा मशिदीत वा मंदिरात इच्छेनुरूप जो तो प्रार्थना करतो.” घना सांगत होता.

भोजनाला सारे तेथलेच पदार्थ होते. तेथलीच केळी आणि तेथल्याच रताळ्यांचे पीठ कणकेत मिसळून केलेल्या पोळ्या फारच रुचकर लागत होत्या.

“रताळी उकडून ती वाटून तो गोळा कणकेत मिसळला तर पोळी अधिकच छान होते.” मालती म्हणाली.

जयप्रकाश मंदमधुर हसले.

रात्री नाटक होते.

जयप्रकाश बसले. प्रभावतीदेवी आहेत. सुंदरदास आहेत. आसपासच्या गावचे लोक आहेत. घनाने आतापर्यंत जे झगडे केले तेच या नाटकात होते. सुंदरदास जणू स्वत:तेही जीवन त्यात पाहात होते.

नाटकाच्या शेवटी नायक म्हणतो, “हा आमचा नवा प्रयोग, ही आमची नवी संस्कृती.”

« PreviousChapter ListNext »