Bookstruck

पत्री 88

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मृत्युमित्र

( कोलेरिज कवीने एका अर्भकाच्या मृत्युप्रसंगी चारच ओळींचा श्लोक लिहिला, त्याचा अनुवाद.)

अद्याप पातकाने। नाहीच स्पर्शिलेली
अद्याप दु:खदैन्ये। नाहीच भाजिलेली
तो येइ मृत्युमित्र। कळि गोड ही खुडीत
फुलली न पूर्ण तोची। देवासमीप नेत
‘देवासमीप आता। कलिके फुले सुखाने
येथे किडी न खाती’। मृत्यू वदे मुखाने

-अमळनेर १९२८

शांति कोण आणते?


(जगात मोठमोठ्या लढाया होताता. शेवटी तह होतात. शांती येते. परंतु हे तह, ही शांति कोण घडवून आणते? सतीचे अश्रू व संतांची प्रार्थना. एका इंग्रची कवितेच्या आधारे.)

शस्त्रास्त्रांनी सुटती न कधी प्रश्न ते जीवनाचे
ना केव्हाही मिटतिल लढे संगराने रणाचे
शांती येते भुवनि न कधी बाँबतोफादिकांनी
अर्की निर्मी अमृतरस हे ऐकिले काय कोणी?।।

युद्धी जाई पति मरुनिया होइ पत्नी अनाथा
बाळा घेई जवळि रडते फोडूनी स्वीय माथा
शोकावेगे अगतिक अशी सोडिते अश्रुधार
त्या अश्रूंनी सकल जगती शांतिचा येइ पूर।।

“येवो देवा! सकल भुवनी प्रेम, दावी सुपंथ
मद्वंधना, सतत चुकती, तू क्षमा मूर्तिमंत”
ऐशी अंत:करणि करि जी प्रार्थना नित्य संत
आणी तीच प्रशमुनि रणे शांततेचा वसंत।।

जे कारुण्ये कढत कढत श्वास तो संत सोडी
त्यांच्यामध्ये अभिनव असे तेच त्याला न जोडी;
धर्मग्रंथांमधिल सगळे सार ते मूर्तिमंत
सत्यश्रू तो उभय मिळुनी होतसे आपदंत।।

-त्रिचनापल्ली तुरुंग, फेब्रुवारी १९३१

« PreviousChapter ListNext »