आशा-निराशा 2

“त्याचे मन त्याला खात असेल. त्याच्या मनाला मोठा धक्का बसला असेल. नाही आई?”

“त्याची शुध्द गेली म्हणतात. स्मृती गेली म्हणतात. काही तरी बडबडतो. त्याचे मामा त्याला घेऊन गेले. तो “सरला, सरला” असे म्हणे असे सांगतात. खरेखोटे देवाला माहीत. परवा जळगावहून ते वासुदेवराव आले होते, ते नव्हते का सांगत?”

“आपण जळगावला गेलो की सारे कळेल.”

“परंतु त्याचे मामा त्याला घेऊन गेले.”

“वर्‍हाडात ना ग आई त्याचे मामा असतात?”

“द्वारकाबाई असे म्हणत खर्‍या. भाऊ पोलिस खात्यातला. बहीण अशी गरीब स्वयंपाकीणबाई. परंतु त्याने तिचे सारे केले. पोटचा मुलगा आला नाही. परंतु पाठचा भाऊ धावून आला.”

“आई, त्याची खरेच का ग कोणी सरला असेल?”

“आपल्याला काय माहीत?”

“परंतु तो मला म्हणाला. ते खोटे नसेल. त्या सरलेचे काय होईल? उदय असा स्मृतिहीन झालेला. त्याची सरला रडत असेल.”

“अगं, तिच्या आईबापांनी तिचे कोणाजवळ लग्नही करून टाकले असेल. कॉलेजमध्ये होता. असेल कोणी सरला. परंतु अशा सरला का खरेच मिळत असतात? तुझे नाही का आम्ही लग्न करून टाकले?”

“आई, कशाला ग माझे इतक्या लवकर लग्न केलेस?”

“त्या सरलेसारखे रडत बसायला लागू नये म्हणून. नल्ये, तू वेडी आहेस. आता सुखाचा संसार कर. काय आहे ग कमी? केवढा त्यांचा वाडा, केवढी इस्टेट.”

“आई, मला लगेच परत पाठवणार?”

“करू तुझी शेवटची मंगळागौर व पाठवू. आता का माहेरी फार दिवस राहायचे? आताच ते पाठवीत नव्हते. परंतु शेवटी त्यांनी दिला होकार. राहा आठ-पंधरा दिवस नि मग जा. पुढे बाळंतपणाला ये.”

“इश्श, तुझे आपले काहीतरीच.”

“नीज जरा.”