Bookstruck

आशा-निराशा 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“नल्ये, खिडकी लाव. पाणी बघ आत आले.” आई म्हणाली.

“असू दे ग उघडी.” नली म्हणाली.

“सारे केस भिजताहेत, बघ.”

“भिजू देत.”

“तू ऐकायची नाहीस.”

परंतु पाऊस जरा थांबला. सर्वत्र हिरवेगार दिसत होते. मध्येच बोगदा आला म्हणजे वाईट वाटे.
“सरलाताई, कशी आहे सृष्टी?”

“सुंदर आहे. सृष्टी नित्य नवीन आहे. सृष्टीचे स्वरूप बाराही महिने उजाड असे कधी नसते. परमेश्वर झाडांना, वृक्षवेलींना नवीन पालवी आणतो, त्यांना नटवतो, फुलवतो. सारी सृष्टी तो हिरवी हिरवी करतो. परंतु मानवी जीवन वर्षानुवर्ष कधी कधी उजाड असते.”

“मधून मधून आनंद नाही का मिळत?”

“कोणाच्या नशिबी कायमचेच दु:ख असते !”

“मला नाही असे वाटत. तुम्हाला कधी सुखाचे क्षण नाही मिळाले? एखादे वेळेस आपण सुखाच्या स्वर्गात आहोत असे वाटते. क्षणभर का होईना सुखाची हवा येते. जीवनाला टवटवी येते. केवळ दु:खमय असे जीवन असूच शकणार नाही. गरिबांतला गरीब घ्या. त्यालाही काही आनंद असतो. मुलांजवळ दोन शब्द बोलेल, आईबापांचे सुख असेल, एखादा मित्र असेल, तुम्हाला नाही माझे बोलणे पटत? खरे सांगा.”

“होय. मलाही सुखाचे क्षण मिळाले आहेत. आणि त्यामुळेच मी जिवंत आहे.”

नली तिकडे तिच्या वडिलांनी बोलावले म्हणून गेली. ते तोतापुरी मद्रासी आंबे फोडायला सांगत होते.

“बाबा, या आंब्यात किडा असतो हो.”

“तू खाऊ नकोस.”

“मला तर आवडतो आंबा. बाठीत आळी असते. ती म्हणे उडून जाते. गंमत आहे, नाही बाबा?”

“काप आधी. उगीच वटवट. जरा नीज म्हटले तर तिकडे बोलत बसली.”

“बाबा, ती माझी मैत्रीण आहे.”

“आगगाडीतली ना?”

“नाही काही. पूर्वजन्मीची.”

“तुझ्या आईला उठव.”

नलीची आई उठली. नलूने सर्वांना फाकी दिल्या. तिने सरलेलाही दिल्या. हात धुऊन नली पुन्हा सरलेजवळ बसली. परंतु सरला जरा दु:खगंभीर होती. बोलण्याच्या मन:स्थितीत ती नव्हती. तिच्या हृदयात अपार दु:ख होते. कालवाकालव होती. तिचे दु:ख त्यांना काय कळणार?

आणि कल्याण आले. सारी मंडळी उतरली.

“सरलाताई, येता का आमच्याबरोबर? तुमचे कोणी आले आहे का?”

“दिसत तर नाही कोणी.”

“मग चला आमच्याबरोबर. उद्याचा दिवस राहा व मग जा नागपूरला. ओळख दृढ होईल.”

« PreviousChapter ListNext »