Bookstruck

सनातनींची सभा 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“नभासारखे रूप या राघवाचे”

आकाशाखाली आपण सारे जमतो, त्याप्रमाणे प्रभूजवळ सारी जमू या. अस्पृश्य जेथे जाऊ शकत नाहीत, जेथे सारे मानव जाऊ शकत नाहीत, तेथे का देव आहे? तेथे देव नसून तुमच्या-आमच्या अहंकाराची दगडी मूर्ती आहे, अहंकार आहे, भेदाभेदांची भुते आहेत. जेथे प्रभूची मूर्ती असेल तेथे आपण सारी जाऊ या. प्रभूसमोर लवू या. तेथे नको मनात ब्राम्हण्य, नको काही. तेथे केवळ निरहंकारी होऊन आपण उभे राहिले पाहिजे.

“मी तुम्हांला काय सांगू? मी आगीतून गेल्ये आहे. अपार दु:ख अनुभविले आहे. तुम्ही उदार व्हा, सहानुभूती शिका. आपल्या मुलींवर प्रेम करा. त्यांची हृदये पाहा. स्त्रियांची गुलामगिरी दूर करा. अस्पृश्यांवरची गुलामगिरी दूर करा. गरिबांवरची गुलामगिरी दूर करा. समाजात आपण सर्वत्र गुलामगिरी निर्माण केली. आणि तिच्यातूनच परकी सत्तेची, साम्राज्यवाद्यांची ही भयंकर गुलामगिरी जन्माला आली.

“आज कोठला धर्म? तुम्ही वर्णाश्रम-स्वराज्य-संघाचे सभासद. परंतु आज वर्ण उरला आहे का? आपल्या आवडीची सेवामय स्वधर्मकर्मे येतात का करता? ब्राम्हण सारे परसत्तेचे हस्त झाले आहेत. ज्यांनी स्वतंत्र विचार द्यावा, मुक्तीचा मार्ग दाखवावा, ते परसत्तेचे नोकर झाले आहेत ! आणि क्षत्रिय? मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी कोणता क्षत्रिय तडफडत आहे? क्षत्रियही परसत्तेचे हस्तक झाले आहेत ! आणि व्यापारी? तेही परसत्तेचे दलाल बनले आहेत ! आज हिंदुस्थानात एकच वर्ण आहे. तो म्हणजे गुलामगिरीचा ! आपण सारे गुलाम आहोत ! आणि आश्रम तरी आहेत का? समाजाची सेवा करण्यासाठी बाहेर पडणारे कोणी आहेत का वानप्रस्थ? कोणी आहेत का संन्यासी? जर वानप्रस्थ आश्रम जिवंत असता, खरा संन्यास जिवंत असता, तर देशात अज्ञान राहिले नसते. साक्षरतेचा प्रसार झाला असता. नवविचार सर्वत्र गेले असते. आपणांजवळ ना वर्ण, ना आश्रम; आणि स्वराज्य तर दूरच राहिले ! सारा शब्दांचा पसारा ! सारे बुडबुडे !

“मी काय सांगू? मी पहाटे सारखी विचार करीत होत्ये. काय बोलू; काय सांगू याचा विचार करीत होत्ये. हे मी आज बोलत नाही. प्रभूचा हा शेला मला बोलवीत आहे. बंधूंनो, उदार बना, सारे जवळ या. एकमेकांना प्रेम द्या. माणुसकी जीवनात आणा. सर्वांची मान उंच करा. कोणी दीन, दरिद्री नको. कोणाच्याही भावनांचा कोंडमारा नको. सर्वांच्या भुका-शारीरिक व मानसिक भुका-नीट प्रमाणात पुरविल्या जावोत. सर्वांचा नीट विकास होवो. सर्वांची नीट धारणा जेथे होते, सर्वांचा संसार जेथे सुखाने होतो तेथे धर्म असतो.

“अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक”


« PreviousChapter ListNext »