जातककथासंग्रह भाग १ ला 74

५६. नीचाची संगती धरूं नये.

(गोधजातक नं. १४१)


एका जन्मीं बोधिसत्त्व घोरपडीच्या कुलांत जन्मला होता. त्याच्या मुलाची एका सरड्यावर फार प्रीती जडली. त्यांची मैत्री इतकी दाट झाली कीं, उठल्या सुटल्या बोधिसत्त्वाचा मुलगा सरड्यापाशीं जाऊं लागला. बोधिसत्त्वाच्या निदर्शनास जेव्हां ही गोष्ट आली, तेव्हां तो आपल्या मुलाला म्हणाला, ''बाबारे, सरडा म्हटला म्हणजे हीन जातीचा. त्याच्याशीं आमाच्या सारख्याचा संबंध अगदींच शोभत नाहीं. पण ही गोष्ट राहूं द्या बाजूला. अशा नीच प्राण्याशीं संगती केली असतां त्याचे परिणाम भयंकर होत असतात. तेव्हां आम्हां सर्वांच्या हितासाठीं तूं त्या हलकटाची संगती सोडून दे.''

परंतु बोधिसत्त्वाचा मुलगा आज्ञाधारक नव्हता. बापाचा उपदेश न ऐकतां त्यानें सरड्यावर आपला सर्व विश्वास टाकला; आपल्या बिळाची त्याला सर्व माहिती सांगितली, व त्याच्या सहवासांत तो फार आनंद मानूं लागला. लहान असतांना याचें आणि सरड्याचें मान जवळ जवळ सारखेंच होतें; परंतु दिवसेंदिवस हा सरड्याच्या चौपट दसपट वाढत गेला. तें पाहून सरडा त्याचा मनांतल्या मनांत फार मत्सर करूं लागला. मी आहें तेवढा आहें आणि हा मात्र आयत्या पिठावर रेघा ओढणार्‍या श्रीमंत बापाच्या पोराप्रमाणें एकसारखा फुगत चालला आहे ! असें वाटून सरड्याचें चित्त झुरणीस लागलें. आणखी जेव्हां जेव्हां हा घोरपडीचा पोरगा सरड्याला प्रेमालिंगन देत असे तेव्हां तेव्हां सरड्याची सर्व गात्रें तुटून पडण्याच्या बेतास येत असत. त्या वेळीं तर बाह्यात्कारी सरडा हांसत असे, पण मनांतल्या मनांत त्याला रडूं येई.

एके दिवशीं एक पारधी हातांत कुदळ घेऊन पुष्कळ कुत्र्यांसह वर्तमान घोरपडीची शिकार करण्यासाठीं त्या जंगलांत फिरत होता. त्याला पाहून सरडा म्हणाला. ''तुम्ही कुदळ आणि कुत्रे घेऊन कोठें जातां ?''

पारधी म्हणाला, ''घोरपडीची शिकार करण्यासाठीं मी या जंगलांत आलों आहें.''

सरडा म्हणाला, ''तुमचे कुत्रे माझ्या वाटेला जाणार नसले तर मी तुम्हाला एक मोठें बीळ दाखवून देतों. तुम्ही पाचोंळा गोळा करून गांवातून आग घेऊन या.''

पारध्यानें सरड्याला आश्वासन देऊन पाचोळा गोळा केला व आग आणून सरड्यानें दाखवून दिलेल्या बोधिसत्त्वाच्या बिळाच्या तोंडावर आग पेटवून व वारा घालून घोरपडी गुदमरून जातील असें केलें. बिचार्‍या घोरपडी आपला जीव वांचविण्यासाठीं बिळाच्या दुसर्‍या तोंडावाटे बाहेर पडूं लागल्या. कित्येकीला पारध्यानेंच ठार मारलें व कित्येकींला कुत्र्यांनीं पकडलें. बोधिसत्त्व आणि त्याचे कांहीं मित्र मात्र पारध्याच्या आणि त्याच्या कुत्र्याच्या तावडींत सांपडले नाहींत. सगळ्या घोरपडी खलास झाल्या असें वाटून पारधी आपले कुत्रे व मिळालेली शिकार घेऊन घरीं गेला. तेव्हां बोधिसत्त्व बिळाबाहेर येऊन आपल्या मित्रांना म्हणाला, ''सखेहो आपण येथें रहाणें सुरक्षित नाहीं. माझ्या मुलानें सरड्याची संगति केली, तेव्हांच आपण येथें न रहातां दुसरीकडे जावयास पाहिजे होतें. कां कीं, कुळांतील एकजणानें दुष्टाची संगति केली म्हणजे त्या सर्व कुळावर संकट ओढवल्यावाचून रहात नाहीं.''

बोधिसत्त्व आणि त्याचे मित्र त्या प्रदेशांतून दूर जाऊन तेथें राहिले.