Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 134

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
९१. ठेंच लागल्यावर तरी शहाणें व्हावें.

(दद्दरजातक नं. ३०४)


प्राचीन काळीं हिमालय पर्वतावर दद्दर नांवाच्या टेकडींखालीं नागांची मोठी वस्ती होती. त्यांच्या राजाला महादद्दर आणि चुल्लदद्दर असे दोन पुत्र होते. पैकीं पहिला आमचा बोधिसत्त्व होता. चुल्लदद्दर मोठा तापट असे. भलत्या भलत्याच्या अंगावर तुटून पडून तो मारामारी करी. त्याचा गुन्हा असह्य होऊन बापानें त्याला आपल्या राज्यांतून हाकून देण्याचा हुकूम फर्माविला. परंतु, बाधिसत्त्वानें विनंति करून बापाकडून त्याला क्षमा करविली. असा प्रकार दोन तीनदां घडून आला. चवथ्या वेळीं बोधिसत्त्व बापाजवळ क्षमा मागण्यास गेला तेव्हां नागराजा म्हणाला, ''तूं त्याला क्षमा करण्यास सांगतोस म्हणून दिवसेंदिवस तो अधिकाधिक बिघडत चालला आहे. अर्थात् तूं त्याच्या गुन्ह्याला उत्तेजन देण्यास कारण झाला आहेस. म्हणून या खेपेस त्या बरोबर तुलाहि मी दंड करतों. दोघे माझ्या राज्यांतून बाहेर जाऊन वाराणसीं बाहेर कचरा फेंकण्याच्या जागीं तीन वर्षे रहा; आणि या अवधींत चुल्लदद्दराचें वर्तन सुधारलें तरच परत या.''

त्यावर महादद्दर उत्तर देई, ''बाबारे या तुझ्या तापटपणामुळें आम्हां दोघांवरही देशत्यागाचें संकट ओढवलें आहे. आतां पुनः तोच दुर्गुण अंतःकरणांत वाढूं दिलास, तर पुढें काय विघ्नपरंपरा ओढवेल हें सांगतां येत नाहीं ! आम्हीं अज्ञांतवासांत आहों, हें लक्षांत ठेव आणि यःकश्चित् मुलांनीं किंवा इतर प्राण्यांनीं अपमान केला तरी तो सहन कर. ठेंच लागल्यावर तरी शहाणा हो !''

चुल्लदद्दरानें वडील भावाचें सांगणें ऐकलें आणि पोरासोराकडून घडणारी अवज्ञा मुकाट्यानें सहन केली. तीन वर्षे झाल्यावर चुल्लदद्दराचें वर्तन चांगलें सुधारलें आहे असें जाणून नागराजानें त्यांना पुनः आपल्या राज्यांत बोलावून नेलें.
« PreviousChapter ListNext »