जातककथासंग्रह भाग ३ रा 9

मल्लांना राजाज्ञा शिरसा वंद्य वाटली. ताबडतोब एक उत्सव जाहीर करण्यांत आला व रंगभूमी सज्ज करून तेथें या उत्सवांत अमक्या दिवशीं कुस्त्या होतील हें वर्तमान भेरी वाजवून प्रसिद्ध करण्यांत आलें. जेथें जेथें कुस्त्या होत असत तेथें तेथें वासुदेव, बलदेव वगैरे दहा भाऊ हजर असावयाचेच. त्याप्रमाणें या कुस्त्यांच्या दिवशीं ते तेथें आले.

रंगवाटा प्रथमतः चाणूर गर्जना करून उतरला व आपणाशीं मल्लयुद्ध करण्याला जो सज्ज असेल त्यानें पुढें व्हावें असें म्हणून तो प्रतिपक्षाशीं कुस्ती देण्यास सज्ज राहिला. बलदेवाला त्याच्या या वल्गनेचें हसूं आलें. तो आपणाशींच म्हणाला, ''असल्या नीच मल्लाला मी शिवूं देखील इच्छित नाहीं. याला हस्तस्पर्श न करितांच मारून टाकावें हें बरें.'' असें म्हणून जवळच्या हस्तिशाळेंतील मोठे दोरखंड घेऊन त्यानें आखाड्यांत उडी टाकली, आणि चाणूराला त्या दोरखंडानें गुंडाळून मस्तकाभोंवतीं चक्राकार फिरवून जोरानें जमिनीवर आदळलें व तो मेला असें पाहून त्याला रंगवाटांच्या बाहेर फेकून दिले.

तें पाहून मुष्टिक पुढें सरसावला आणि बलदेवाच्या अंगावर धांवला. पण बलदेवानें त्याचीं हाडें नरम करून तो ''मी मल्ल नाहीं, मी मल्ल नाहीं'' असें मोठ्यानें ओरडत असतांच त्याला ठार मारिलें. मुष्टिकानें मरण्याच्या वेळीं अशी प्रार्थना केली कीं, मेल्यानंतर यक्ष होऊन बलदेवाला खाण्याचें आपणास सामर्थ्य यावें. त्याच्या इच्छेप्रमाणें मरणोत्तर तो कालमत्तिय नांवाच्या अरण्यांत यक्षयोनींत जन्मला.

दोन्ही मल्लांची अशी दुर्दशा झालेली पाहून कंसराजा क्रोधाविष्ट होऊन म्हणाला, ''या दहाहि बंधूंना एकदम कैद करा.'' इतकें बोलून राजा आसनावरून उठतो न उठतो तोंच वासुदेवानें आपलें चक्र फेकून त्याचा आणि त्याच्या भावाचा शिरच्छेद केला. नगरवासी लोक या त्यांच्या कृत्यानें गर्भगलित होऊन त्यांनाच शरण गेले. तेव्हां वासुदेवानें त्यांना अभयदान दिलें व आपल्या आईबापांला असितांजन नगरींत आणून राज्याची स्थापना केली.

पुढें या दाही बंधुंनीं सगह्या जंबुद्वीपाचें राज्य काबीज करण्याचा निश्चय करून कालसेन राजाच्या अयोध्या राजधानीवर हल्ला केला व मोठ्या पराक्रमानें तें नगर आपल्या हस्तगत केलें. शेवटीं सर्व प्रदेशांत विजय संपादन करीत ते द्वारवतीला आले.

या नगरासंबंधानें अशी गोष्ट सांगतात कीं त्याच्या एका बाजूला समुद्र व दुसर्‍या बाजूला पर्वत असे. आणि तेथें पुष्कळ यक्षांची वस्ती होती. कोणी शत्रू आल्याबरोबर यक्षांच्या प्रभावानें हें शहर एकदम उड्डान करून समुद्रांतील एका बेटावर जाऊन बसत असे. आणि शत्रू निघून गेल्यावर पुनः पूर्वस्थळीं येत असे.

हा प्रकार पाहून वासुदेवादिक दहाहि बंधू फार घोटाळ्यांत पडले आणि कृष्णद्वैपायन नांवाच्या ॠषीजवळ जाऊन द्वारवती आपल्या हस्तगत कशी होईल या विषयीं त्यांनी सल्ला विचारला.