Bookstruck

जातककथासंग्रह भाग ३ रा 21

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१३८. राजाशीं सलगी करूं नये.

(जवनहंसजातक नं. ४७६)


शरदृतूमध्यें चित्रकूटपर्वतावरील कांहीं हंस वाराणसीला आले. त्या सुंदर प्राण्यांला पाहून वाराणसीचा राजा मोहित झाला आणि मोठ्या प्रेमानें त्याला त्यानें पुष्कळ गोड पदार्थ चारले.

पुढें वर्षाकाळ समीप आल्यावर पुनः ते चित्रकूटपर्वतावर जाण्यास निघाले. तेव्हां राजानें त्यांला वाराणसींतच रहाण्यास आग्रह केला. परंतु ते म्हणाले, ''महाराज, आमच्या राजाची आम्हांस रहाण्यास परवानगी नाहीं. व राजाज्ञेवाचून आम्हांला वर्षाकालीं बाहेर रहातां येत नाहीं.''

हंसपक्ष्यांत देखील राजा असतो हें ऐकून राजाला अधिक जिज्ञासा उत्पन्न झाली आणि तो म्हणाला, ''तुमच्या राजाचा कारभार कसा काय असतो ?''

त्या जन्मीं बोधिसत्त्व चित्रकूटपर्वतावरील हंसांचें राज्यपद पावला होता. आणि आपल्या सर्व बळाचा उपयोग तो हंसजातीच्या कल्याणार्थ करीत असे. वाराणसीला आलेल्या त्या हंसांनीं आपल्या राजाचें अत्यंत सुरस शब्दांनीं इत्थंभूत वर्णन केलें. व त्याचा वाराणसीच्या राजावर असा परिणाम झाला कीं तो बोधिसत्त्वाच्या दर्शनाला फार उत्सुक झाला.

आपल्या राजाला एकदां येथें घेऊन यावें अशी त्यानें त्या हंसांची विनवणी केली. तेव्हां ते म्हणाले, ''महाराज, आपला निरोप आमच्या राजेसाहेबांला सांगूं व थोडक्या दिवसांसाठीं तरी येथें येण्यासाठीं त्यांचें मन वळवूं.'' असें सांगून राजाचा निरोप घेऊन ते हंस चित्रकूटपर्वतावर गेले. व वाराणसी राजाचा निरोप त्यांनीं हंसराजाला कळविला.

त्यांच्या आग्रहास्तव वर्षाकाळ संपल्यावर बोधिसत्त्व त्यांपैकी कांहींजणांना बरोबर घेऊन वाराणसीला राजोद्यानांत येऊन उतरला. हंसांनीं आपले हंसभूपति उद्यानांत आले आहेत अशी वाराणसी राजाला वर्दी दिली. तेव्हां मोठ्या लवाजम्यानिशी राजा उद्यानांत जाऊन बोधिसत्त्वाची भेट घेता झाला.
« PreviousChapter ListNext »