Bookstruck

जातककथासंग्रह भाग ३ रा 22

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
कुशलप्रश्नादिक झाल्यावर तो म्हणाला, ''हे हंसराज, तुझे गुण ऐकूनच मी तुझ्यावर प्रसन्न झालों होतों. आतां तर प्रत्यक्ष तुझी भेट होऊन तुझ्याशीं संवाद करण्याची सुसंधि मला प्राप्‍त झाली आहे. आतां माझी तुला अशी विनंति आहे कीं, तूं सर्वकाल आमच्या या विख्यात नगरींत वास करावा. कां कीं, तुझ्यासारख्या गुणी प्राण्याला हेंच स्थान योग्य आहे.''

हंसराजा म्हणाला, ''महाराज, आपली ही गुणग्राहकता पाहून मला फार आनंद होतो. राज्यपदावर आरूढ झालेल्या व्यक्तींत अशी गुणग्राहकता असणें हें लोकांचें मोठें भाग्य होय. परंतु आपलें प्रेम कायमच टिकेल याचा नेम काय ? एखादेदिवशीं मद्यप्राशनांत गुंग होऊन आपण असा हुकूम द्याल कीं, हंसराजाला मारून चांगलें पक्वान्न तयार करा.''

राजा म्हणाला, ''मित्रा, जर माझा तुला विश्वास पटत नसेल तर तूं येथें असेपर्यंत मी मद्यपान करणार नाहीं अशी शपथ वहातो. परंतु तूं मला सोडून जाऊं नको.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''सिंहशृगालादिक पशूंचें हद्‍गत ताबडतोब ओळखतां येतें. परंतु मनुष्याचें हद्‍गत जाणण्याचें काम अत्यंत कठीण आहे. त्यांतहि राज्यपदावर आरूढ झालेला मनुष्य कधीं बदलेल याचा नेम सांगतां येत नाहीं. म्हणून कृपा करून मला आपणाशी निकट संबंध ठेविण्याविषयीं आग्रह करूं नका.''

राजा म्हणाला, ''तुझ्यासारख्या सूज्ञ प्राण्यानें मित्राच्या नम्र विनंतीचा अव्हेर करावा ही किती खेदाची गोष्ट आहे बरें ! मी इतकें विनवलें असतां तुला माझी दया येऊं नये याचें मला आश्चर्य वाटतें.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, याचें कारण असें आहे कीं, माझ्यापासून आपला कोणताही कार्यभाग खोळंबणार नाहीं. परंतु मी अत्यंत निकट असल्यानें मात्र आपण बराच वेळ माझ्याशी घालवाल व तेणेकरून प्रजाहितांत व्यत्यय आणाल.

बरें माझा तरी येथें राहिल्यामुळें विशेष फायदा होण्याचा संभव नाही. अतिपरिचयानें लौकरच माझ्याहातून आपली अवज्ञा होण्यास प्रारंभ होईल व त्यायोगें मला पश्चात्ताप करण्याचा प्रसंग येईल. म्हणून जोपर्यंत माझा व आपल्या प्रेमाचा संबंध आहे तोपर्यंत येथून निघून जावें हें योग्य आहे. जर मी जगलों तर मधून मधून आमची भेट होईल व अतिपरिचय न घडल्यामुळें आमचें प्रेमहि कायम राहील.''

असें बोलून हंसराजा आपल्या परिवारासह तेथून उडून चित्रकूट पर्वतावर गेला. त्याच्या उपदेशानें वाराणसीचा राजाहि जागृत बुद्धीनें वागून प्रजाहिततत्पर झाला व राजावर विश्वास टाकूं नये या म्हणीला आपण अपवाद आहे असें त्यानें कृतीनें दाखविलें.
« PreviousChapter ListNext »