Bookstruck

धर्म 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
२ मैत्री.

द्वेषचरिताला मैत्रीभावना पथ्थकारक आहे. मैत्रीभावनेचें विधान:-

अत्तूपमाय सब्बेसं सत्तनं सुखकामतं।
पस्सित्वा कमतो मेत्तं सब्बसत्तेसु भावये।।

आपल्याप्रमाणेंच सर्व प्राणिमात्र सुखाची इच्छा करितात, असें जाणून क्रमाकमानें त्या सर्वांविषयी प्रेमभाव उत्पन्न करावा.

सुखी भवेय़्यं निदुक्खो अहं निच्चं अहं विय।
हिताच मे सुखी होन्तु मज्झत्ता चथ वेरिनो।।

सदा सर्वदा मीं सुखी असावें, मीं निर्दु:खी असावें. माझ्याप्रमाणें माझे मित्रहि सुखी होवोत, मध्यस्थहि सुखी होवोत, आणि माझे वैरीहि सुखी होवोत।

इमम्हि गामक्खेत्तम्हि सत्ता होन्तु सुखी सदा।
ततो परं च रज्जेसु चक्कवाळेसु जंतुनो।।


ह्या आसपासच्या शेतांतील आणि ह्या गांवातींल सर्व प्राणी सर्वकाल सुखी होवोत, ह्या राज्यांतील प्राणी सुखी होवोत. ह्या विश्वांतील (सर्व) प्राणी सुखी होवोत.

तथा इत्थी पुमा चेव अरिया अनरियापि च।
देवा नरा अपायट्ठा तथा दसदिसासु च।।

त्याचप्रमाणें स्त्रिया आणि पुरूष, आर्य आणि अनार्य, देव आणि मनुष्य हे सर्व सुखी होवोत. दुर्गतीप्रत गेलेले प्राणीहि सुखी होवोत. दाही दिशांला सर्वप्राणी सुखी होवोत.

या श्लोकांत क्रमाक्रंमानें प्रेमभाव कसा वाढवावा,हें सांगितलें आहे. प्रथमत: स्वत:वरच प्रेम उत्पन्न करून तें आपल्या मित्रांवर, मध्यस्थांवर व तदनंतर आपल्या शत्रूंवरहि उत्पन्न केलें पाहिजे. तसेंच तें पहिल्यानें आपल्या गांवच्या प्राण्यावर उत्पन्न करून हळू हळू त्याची मर्यादा विश्वमर्यादेपर्यंत नेऊन पोंचविली पाहिजे. सगळा प्राणिसमुदाय आपल्या डोळ्यांसमोर उभा आहे कीं काय अशी कल्पना करून त्यांजवर मी मनोभावें प्रेम करीत आहें, माझें अंत:करण प्रेममय झालें आहे, मला शत्रु ह्मणून कोणीच राहिला नाहीं, व्याघ्र, सिंह इत्यादि हिस्त्र प्राणी देखील माझे मित्र झाले आहेत. सर्प माझ्या अंगावर लोळत आहेत, हा वाघ या बाजूला माझ्या मांडीवर डोकें ठेवून स्वस्थ झोंपी गेला आहे, कोणापासूनच मला भय ह्नाणून राहीलें नाहीं, अशी भावना केली पाहिजे.

एकाद्याच्या अंत:करणामध्यें द्वेषभाव तीव्र असल्यामुळें त्याच्या शत्रूची त्याला वारंवार आठवण होते; आणि तिच्या योगें मैत्री भावनेस जबरदस्त अडथळा येतो. अशा मनुष्यानें बुद्धोपदेशाचें आणि साधुसंतांच्या उपदेशाचें  पारायण करून आपल्या मनांतील वैरभाव दूर दवडण्याचा प्रयत्न करावा. या संबंधीं ककचूपमसुत्तांत भगवान् बुद्धानें भिक्षूंस केलेला उपदेश ध्यानांत ठेवण्यासारखा आहे.
« PreviousChapter ListNext »