Bookstruck

प्रकरण एक ते बारा 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
काम्बोज देशातील बहुजन किडे, पतंग वगैरे प्राण्यांना मारल्यानेच आत्मशुद्धि होते असे समजत.

कीटा पतंगा उरगा न भेका
हन्त्वा किमिं सुज्झति मक्खिका च।
एते हि धम्मा अनरियरूपा
कम्बोजकानं वितथा बहुन्नं।। (भूरिदत्तजातक, श्लोक ९०३)

‘किडे, पतंग, सर्प, बेडूक, कृमि आणि माशा मारल्याने मनुष्यप्राणी शुद्ध होतो, असा अनार्य आणि अतथ्य धर्म काम्बोजांतील बहुजन मानतात.’

यावरून हे लोक, सध्या जसे सरहद्दीवरचे लोक आहेत, तसेच मागासलेले होते असे दिसते.

मनोरथपूरवी अट्ठकथेत महाकप्पिनाची गोष्ट आली आहे. तो सरहद्दीवरील कुक्कुटवती नावाच्या राजधानीत राज्य करीत होता, आणि पुढे बुद्धाचे गुण ऐकून मध्यदेशात आला. चंद्रभागा नदीच्या काठी त्याची आणि भगवान बुद्धाची गाठ पडली. तेथे भगवंताने कप्पिनाला त्याच्या अमात्यंसह भिक्षुसंघांत घेतले. इत्यादि. (बौद्धसंघाचा परिचय, पृ. २०३ पाहा.)

महकप्पिन राजा होता व तो कुक्कुटवतीत राज्य करीत होता याला आधार संयुक्तनिकायाच्या अट्टकथेत सापडतो. परंतु ही कुक्कुटवती राजधानी काम्बोजात होती, किंवा  त्याच्या जवळच्या कुठल्या तरी दुसर्‍या डोंगराळ संस्थानात होती हे काहीच समजत नाही. एवढे खरे की, बुद्धाच्या ह्यातीतच त्याची कीर्ति आणि प्रभाव या सरहद्दीवरच्या रानटी लोकांत पसरला होता. याला एक आजकालचे उदाहरण देता येण्यासारखे आहे. पंजाबच्या जातिनिविष्ट लोकांत जेवढे  गांधीजींचे वजन आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सरहद्दीवरच्या पठाणात दिसून येते. असाच काहीसा प्रकार बुद्धाच्या वेळी घडून आला असल्यास त्यात आश्चर्य मानण्यासारखे काही नाही.

सोळा राज्यांचा ललितविस्तरात उल्लेख

या सोळा राज्यांचा उल्लेख ललितविस्तरात सापडतो, असे वर म्हटलेच आहे. प्रसंग असा आहे की, बोधिसत्त्व तुषितदेवभवनात असता कोणत्या राज्यात जन्म घेऊन लोकोद्धार करावा याचा विचार करतो. त्याला निरनिराळे देवपुत्र भिन्नभिन्न राजकुलांचे गुण सांगतात व दुसरे काही देवपुत्र त्या कुलांचे दोष दाखवितात.

मगधराजकुल

(१) कोणी देवपुत्र म्हणाले, ‘मगध देशामध्ये हे वैदेहिकुल फार संपन्न असून बोधिसत्त्वाला जन्मण्याला ते स्थान योग्य आहे.’ यावर दुसरे देवपुत्र म्हणाले, ‘हे कुल योग्य नाही. कारण ते मातृशुद्ध आणि पितशुद्ध नसून चंचल आहे; विपुल पुण्याने अभिषिक्त झालेले नाही. उद्यान, तडाग इत्यादिकांनी त्यांची राजधानी सुशोभित नसून जंगली लोकांना शोभेल अशी आहे.’
« PreviousChapter ListNext »