Bookstruck

प्रकरण एक ते बारा 121

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
प्राचीन हिंदु डुकराला संपत्तीचा भाग मानीत

हिंदुस्थानात डुकराला इतके महत्त्व आले नाही, तरी संपत्तीचा तो एक विभाग समजत असत. अरियपरियेंनसनसुत्तात (मज्झिमनि. २६) ऐहिक संपत्तीची अनित्यंता वर्णिली आहे, ती अशी-

‘‘किं च भिक्खवे जातिधम्मं? पुत्तभरियं भिक्खवे जातिधम्मं। दासीदासं.. अजेळकं.. कुक्कुटसूकरं.. हत्तिगवास्सवळवं.. जातरूपरजतं जातिधम्मं।’’

म्हणजे हत्ती, गाई, घोडे वगैरे संपत्तीतच कोंबडी आणि डुकरे यांचादेखील समावेश होत असे. असे असता डुकराच्या मांसासंबंधी
इतका तिटकारा कसा उद्भवला? यज्ञयागात मारल्या जाणार्‍या प्रश्नण्यांत डुकराचा उल्लेख पालिवाङ्मयात सापडत नाही. अर्थात् बुद्धसमकाली हा प्राणी अमेध्य होता. पण तो अभक्ष्य होता, याला काही आधार सापडत नाही. तसे असते तर क्षत्रियांच्या घरच्या संपत्तीत त्याचा समावेश झाला नसता. सूकरमांसाचा निषेध प्रथमत: धर्मसूत्तांत सापडतो. आणि पुढे त्याचाच अनुवाद मनुस्मृति वगैरे स्मृतिग्रन्थात येतो, परंतु अरण्यसूकराचा कधीच निषेध झाला नाही. त्याचे मांस पवित्र गणले गेले आहे.

बुद्धावर अमिताहाराचा खोटा आरोप

बुद्ध भगवंताने परिनिर्वाणापूर्वी खाल्लेला पदार्थ सूकरमांस होता, असे गृहीत धरून चाललो, तरी तो त्याने अजीर्ण होईपर्यंत खाल्ला व त्यामुळे तो मरण पावला, हे जे कुत्सित टीकाकाराचे म्हणणे, ते मात्र सपशेल खोटे आहे. गोतम बुद्धाने अमत आहार केल्याचे उदाहरण किंवा दाखला कोठेच सापडत नाही. तेव्हा याच प्रसंगी त्याने हा पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ला, असे म्हणणे निव्वळ खोडसाळपणाचे आहे. बुद्ध भगवान् त्या प्रसंगापूर्वी तीन महिने वैशाली येथे भयंकर आजारी झाला होता आणि त्यामुळे त्याच्या अंगात त्राण राहिले नव्हतं. चुंदाने दिलेले जेवण केवळ त्याच्या परिनिर्वाणाला निमित्तकारण झाले. त्यायोगे चुंद लोहारावर लोकांनी भलताच आळ आणू नये म्हणून परिनिर्वाणापूर्वी भगवान आनंदाला म्हणाला, ‘‘नंदा, चुंद लोहाराला कोणी म्हणेल की, हे चुंदा, तथागत तू दिलेली भिक्षा घेऊन परिनिर्वाण पावला, यात मोठी गानि आहे. असे म्हणून जर त्याने चुंद लोहाराला वाईट वाटू दिले, तर तुम्ही चुंदाचे दौर्मनस्य याप्रमाणे नष्ट करा. त्याला म्हणा, चुंदा, ज्या तुढा पिंडपात खाऊन तथागत परिनिर्वाण पावला, त्या तुला ते तुझे दान खरोखरच लाभदायक आहे. आम्ही तथागताकडून ऐकले आहे की, इतर भिक्षांपेक्षा तथागताला मिळालेल्या दोन दीक्षा अधिक फलदायक व अधिक प्रशंसनीय आहेत. त्या कोणत्या? जी भिक्षा घेऊन तथागत संबोधिज्ञान मिळवतो तो, आणि जी भिक्षा घेऊन परिनिर्वाण पावतो ती. चुंदाने जे कृत्य केले आहे, ते आयुष्य, वणं, सुख, यश, स्वर्ग आणि स्वामित्व देणारे आहे, असे समजावे. आनंदा, याप्रमाणे चुंदाचे दौर्मनस्य घालवावे.’’
« PreviousChapter ListNext »