Bookstruck

*परिशिष्ट एक ते तीन 16

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
भगवान म्हणाला, हे सारिपुत्त, संसाराला कंटाळून एकान्तवास सेवन करणार्‍या संबोधिपरायण भिक्षूचे जे मला कर्तव्य वाटते ते मी तुला सांगतो. ९

एकान्तवासात राहणार्‍या स्मृतिमान् धीर भिक्षूने पाच भयांना भिऊ नये. डासांच्या चावण्याला, सर्पाना, मनुष्यांच्या उपद्रवाला, चतुष्पादांना. १०

आणि परधर्मिकांना घाबरू नये. परधर्मिकांची पुष्कळ भेसूर कृत्ये पाहूनदेखील त्यांना घाबरू नये. आणि त्या कुशलान्वेषी भिक्षूने दुसरीही विघ्ने सहन करावी. ११

रोगाने आणि भुकेने उत्पन्न होणारा त्रास, थंडी व उन्हाळा त्याने सहन करावा. त्या विघ्नांची अनेकविध बाधा झाली, तरी अनागरिक राहून त्याने आपला उत्साह, पराक्रम दृढ करावा. १२

त्याने चोरी करू नये, खोटे बोलू नये, स्थिरचर प्राण्यांवर मैत्रीची भावना करावी आणि मनाचा कलुषितपणा मारपक्षीय जाणून दूर करावा. १३

त्याने क्रोधाला व अतिमानाला यश होऊ नये. त्यांची पाळेमुळे खणून काढावी आणि खात्रीने बुद्धमार्गगामी होऊन प्रियाप्रिय सहन करावे. १४

कल्याणप्रिय माणसाने प्रज्ञेला महत्त्व देऊन ती विघ्ने सहन करावी, एकान्तवासात असंतोष वाटला, तर तोही सहन करावा, आणि चार शोकप्रद गोष्टी सहन कराव्या.
(त्या ह्या-) मी आज काय खाईन वा कोठे जेवीन, गेल्या रात्री झोप न आल्यामुळे त्रास झाला, आज कोठे झोपावे? अनागरिक शैक्ष्याने (सेख) हे (चार) वितर्क त्यागावे. १६

वेळोवेळी अन्न आणि वस्त्र मिळाले असता त्यात प्रमाण ठेवावे, अल्पसंतोषी व्हावे. त्या पदार्थापासून मनाचे रक्षण करणार्‍या व गावात संयमाने वागणार्‍या भिक्षूने, इतरांनी राग येण्याजोगे कृत्य केले असताही कठोर वचन बोलू नये. १७

त्याने आपली दृष्टि पायांपाशी ठेवावी, चंचळपणे चालू नये, ध्यानरत व जागृत असावे, उपेक्षेचा अवलंब करून चित्त एकाग्र करावे, तर्क आणि चांचल्य यांचा नाश करावा. १८

त्या स्मृतिमन्ताने आपले दोष दाखविणार्‍यांचे अभिवादन करावे, सब्रह्मचार्‍यांविषयी कठोरता बाळगू नये, प्रसंगोपात्त चांगलेच शब्द बोलावे, लोकांच्या वादविवादात शिरण्याची इच्छा धरू नये. १९

तद्नंतर स्मृतिमन्ताने जगातीन पाच रजांचा त्याग करण्यास शिकावे. (म्हणजे) रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श (या पाच रजांचा) यांचा लोभ धरू नये. २०

या पदार्थाचा छन्द सोडून तो स्मृतिमान्, सुविमुक्तचित्त, वेळोवेळी सद्धर्माचे चिंतन करणारा, एकाग्रचित्त भिक्षु अंध:काराचा नाश करण्याला समर्थ होईल (असे भगवान म्हणाला). २१
« PreviousChapter ListNext »