Bookstruck

आत्मवाद 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
अन्योन्यवाद व वैशेषिक दर्शन

पकुध कच्चायनाचा अन्योन्यवाद वैशेषिक दर्शनासारखा होता. पण त्याच्या सात पदार्थांत आणि वैशेषिकांच्या पदार्थांत फार थोडें साम्य आहे. कच्चायनांचा मोठा श्रमणसंघ होता. तथापि त्याची परंपरा कायम राहिली नाही. अर्वाचीन वैशेषिक दर्शन त्याच्याच तत्त्वज्ञानांतून निघाले असावें. पण तशा प्रकारचें तत्त्वज्ञान मानणारा श्रमणसंप्रदाय बुध्दकालानंतर अस्तित्वांत राहिला नसावा.

विक्षेपवाद व स्याद्वाद

संजय बेलट्ठपुत्ताचा विक्षेपवाद जैनांच्या स्याद्वादाप्रमाणे होता. आणि त्याचा समावेश कांही कालाने जैनांनी आपल्या तत्त्वज्ञानांत करून घेतला. 'असें असेल, असें नसेल' (स्यादस्ति स्यान्नास्ति) इत्यादि स्याद्वाद आणि वर वर्णिलेला बेलट्ठपुत्ताचा विक्षेपवाद या दोहोंत फारसा फरक नाही. तेव्हा जैनसंप्रदायाने विक्षेपवादालाच आपलें मुख्य तत्त्वज्ञान बनविलें, असें म्हणण्यास हरकत कोणती?

निर्ग्रंथ आणि आजीवक

बुध्दसमकालीन जैनांचा चोविसावा तीर्थंकर महावीरस्वामी (ज्याला निगण्ठ नागपुत्त म्हणत) व मक्खलि गोसाल, या दोघांनी सहा वर्षेपर्यंत एकत्र राहून तपश्चर्या केली, असें जैन ग्रंथावरून दिसून येतें. आजीवकांचा आणि निग्रन्थांचा संप्रदाय एक करावा, असा त्या दोंघाचा प्रयत्न असावा. पार्श्व मुनीचे संन्यासी एक वस्त्र किंवा तीन वस्त्रें बाळगीत असत. पण महावीरस्वामीने मक्खलि गोसालाचें दिंगबरव्रत स्वीकारले; आणि तेव्हापासून निर्ग्रंथ निर्वस्त्र झाले. परंतु निर्ग्रंथाच्या आणि आजीवकांच्या तत्त्वज्ञानाचा मिलाफ होऊं शकला नाही. महावीरस्वामीने लक्षचौर्‍याशी फेर्‍यांचें तत्त्वज्ञान अंगीकारलें असतें, तर निर्ग्रंथांच्या परंपरेंत चालत आलेल्या चातुर्यामांची किंमत राहिली नसती. प्राणी नियति (नशीब), संगति (परिस्थिति) आणि स्वभाव यांच्या योगाने परिणत होत असतात, असें मानले तर अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या चार यामांचा उपयोग काय? अर्थात् हे दोघेही आचार्य एकत्र राहूं शकले नाहीत.

आजीवकांच्या चौर्‍यांशी लक्ष फेर्‍यांच्या तत्त्वज्ञानापेक्षा निर्ग्रंथांचा चातुर्यामसंवरवाद लोकांना विशेष आवडला, यांत आश्चर्य नाही. कां की, त्याच्या आणि तपश्चर्येच्या योगें मागील जन्मीं केलेलें पाप धुवून टाकता येऊन एका जन्मांतच मोक्ष संपादतां येणें शक्य होतें.

निर्ग्रंथांची माहिती

निर्ग्रंथांच्या मताची बरीच माहिती सुत्तपिटकांत सापडते. पैकी मज्झिमनिकायांतील चूळदुक्खक्खन्ध सुत्तांत बुध्दांचा आणि निर्ग्रथांचा संवाद आहे, त्याचा सारांश असा:-

राजगृह येथे कांही निर्ग्रथ उभे राहून तपश्चर्या करीत असतां बुध्द भगवान् त्यांजपाशीं जाऊन म्हणाला,'' बंधु हो, अशा रीतीने तुम्ही आपल्या शरीराला कष्ट कां देता ?”

ते म्हणाले,'' निर्ग्रथ नाथपुत्त सवज्ञ आहे. चालत असतां, उभा असतां, निजला असतां किंवा जागा असतां आपली ज्ञानदृष्टि कायम असते असें तो म्हणतो, आणि आम्हांस उपदेश करतो की 'निर्ग्रंथ हो, तुम्ही पूर्वजन्मीं पाप केलें आहे, तें अशा प्रकारच्या देहदंडनाने जीर्ण करा (निज्जरेथ), आणि त्या जन्मीं कायावाचामनेंकरून कोणतेंही पाप करूं नका. हयामुळे पूर्वजन्मींच्या पापाचा तपाने नाश, व नवे पाप न केल्यामुळे पुढल्या जन्मीं कर्मक्षय होईल, आणि त्यामुळे सर्व दु:ख नाश पावेल.' हें त्याचें म्हणणें आम्हांस आवडतें.''
« PreviousChapter ListNext »