Bookstruck

यज्ञयाग 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
'लाइट ऑफ एशिया'चा परिणाम

त्यानंतर १८७९ सालीं एडविन् आर्नाल्ड ( Edwin Arnold) यांचा 'लाइट ऑफ एशिया' ( Light of Asia) नांवाचा प्रख्यात काव्यग्रंथ प्रसिध्द झाला. त्याच्या वाचनामुळे इंग्रजी भाषाभिज्ञ हिंदुंची बुध्दाविषयीं आदरबुध्दि वाढली; पण यज्ञयागांचा विध्वंस करून अहिंसा परमधर्म स्थापण्यासाठी बुध्दावतार झाला, या समजुतीला
दृढता येत चालली आणि ही कल्पना थोडयाबहुत प्रमाणाने अद्यापही प्रचलित आहे. या कल्पनेंत कितपत तथ्य आहे हें पाहण्याच्या उद्देशाने बुध्दसमकालीन श्रमणांचे आणि खुद्द बुध्दाचे यज्ञयागासंबधी काय म्हणणे होते, याचा विचार करणें योग्य वाटतें.

हरिकेशिबलाची कथा

श्रमणपंथापैकी जैन आणि बौध्द या दोन पंथाचेचन तेवढे ग्रंन्थ आजला उपलब्ध आहेत. त्यांत जैनांचा उत्तराध्ययनसूत्रांत हरिकेशबल याची गोष्ट सापडते. तिचा सारांश असा-

हरिकेशिबल हा चाण्डालाचा (श्पपाकाचा) मुलगा होता. तो जैन भिक्षु होऊन मोठा तपस्वी झाला. कोणे एके समयीं महिनाभर उपास करून पारण्याच्या दिवशीं भिक्षाटन करीत असतां तो एका महायज्ञाच्या स्थानीं पोचला. मलिनवस्त्राच्छादित त्याचें तें कृश शरीर पाहून याजक ब्राह्मणांनी त्याचा धिक्कार केला आणि त्याला तेथून जावयास सांगितलें. तेथे तिंदुक वृक्षावर राहणारा यक्ष गुप्त रूपाने हरिकेशबलाच्या स्वराने त्या ब्राह्मणांना म्हणाला, '' ब्राह्मणांनो, तुम्ही केवळ शब्दांचा भार वाहणारे आहात; वेदाध्ययन करतां, पण वेदांचा अर्थ तुम्हाला समजत नाही.'' याप्रमाणें त्या भिक्षुने अध्यायक ब्राह्मणांचा उपमर्द केला असें मानून त्या ब्राह्मणांनी आपल्या तरूण कुमारांना त्याला मारहाण करावयास लावलें. त्या कुमारांनी दांडयानी, छडयांनी आणि चाबकांनी त्याला मारण्यास सुरवात केली. तें पाहून कोसलिक राजाची कन्या व पुरोहिताची स्त्री भद्रा यांनी त्यांचा निषेध केला. इतक्यांत अनेक यक्षांनी येऊन त्या कुमारांना रक्तबंबाळ होईपर्यंत ठोकून काढलें. त्यामुळे ब्राह्मण घाबरून गेले, आणि शेवटीं त्यांनी हरिकेशबलाची क्षमा मागून त्याला अनेक पदार्थांसह तांदळाचे उत्तम अन्न अर्पण केलें.

तें अन्न ग्रहण करून हरिकेशिबल त्यांना म्हणाला, ''ब्राम्हणांनो, आग पेटवून पाण्याच्या योगाने बाह्य शुध्दि मिळविण्याच्या मागे का लागला आहा? ही तुमची बाह्य शुध्दि योग्य नाही असे तत्त्वज्ञ म्हणतात.''

त्यावर ते ब्राह्मण म्हणाले, ''हे भिक्षु, आम्ही याग कशा प्रकारचा करावा, आणि कर्माचा नाश कसा करावा?''
« PreviousChapter ListNext »