विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36

१६६. आईबापांनी मुलाला योग्य पदार्थांचें दान दिलें नाहीं, गोड शब्दांनी त्याचें मन सन्मार्गाकडे वळवलें नाहीं, योग्य वयांत त्याच्या अभ्यासाची व उन्नतीची काळजी घेतली नाहीं, आणि तो वयांत आल्यावर त्याला समभावानें वागवलें नाहीं, तर केवल जन्म दिला म्हणून तो मुलगा आईबापांचा मान ठेवील किंवा पूजा करील असें नाहीं. अर्थांत् दान, प्रियवचन, अर्थचर्या किंवा हिताची काळजी घेणें, आणि समानात्मता किंवा समभाव हे चार लोकसंग्रह उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत.

१६७. परन्तु भगवद्‍गीतेंत त्यांचा निखालस विपर्यास केला आहे; तो असा- “मी जर कर्म न करीन तर हे सर्व लोक नाश पावतील; आणि मी संकराचा कर्ता होईन, व ह्या प्रजांचा घात करीन. कर्मांत आसक्त झालेले अज्ञानी लोक ज्याप्रमाणें कर्में करतात, त्याप्रमाणें लोकसंग्रह करूं इच्छिणार्‍या ज्ञानी पुरुषानें आसक्ति सोडून आपलीं कर्में करावींत. कर्मांच्याठायीं आसक्त असलेल्या अज्ञ जनांचा बुद्धिभेद करूं नये. विद्वान् मनुष्यानें आपण योगयुक्त होऊन इतरांकडून सर्व कर्में करवावींत.” (अध्याय ३, श्लो. २४-२६).

१६८. येथें लोकसंग्रह म्हणजे जेणेंकरून वर्णसंकर होणार नाहीं. अशा तर्‍हेनें वागणें. त्यासाठीं आपणाला जरी तत्व माहीत असलें, तरी अज्ञ जनांचा बुद्धिभेद न करतां त्यांना चाललेल्या व्यवहाराप्रमाणें वागण्यास उत्तेजन द्यावें. अशाच समजुतीमुळें महाराष्ट्रांत गणपतीचे मेळे आणि शिवाजीचा उत्सव निघाला हें सांगावयास नकोच. परन्तु अशा लोकसंग्रहाचा परिणाम असा होतो कीं, जो शिंगें मोडून वासरांत शिरूं पहातो तो स्वत:हि वासरूंच बनतो. लोकांसाठीं म्हणून तो लिंगाची किंवा गणपतीची पूजा सुरू करतो, पण शेवटीं आपणच त्यांत गुरफटला जातो. त्यामुळें लोकांचें तर कल्याण होतच नाहीं, पण हा स्वत: मात्र अत्यन्त धर्मवेडा बनतो.

१६९. आतां असा प्रश्न येतो कीं, जर बौद्धांच्या तत्त्वज्ञानाचा अशा रीतीनें विपर्यास करण्यांत येत होता, तर त्यावर एकाद्या बौद्ध पंडितानें खरमरीत उत्तर कां दिलें नाहीं ? भगवद्‍गीतेच्या वेळीं दिङ्नागासारखे मोठमोठाले बौद्ध पंडित होते. असें असतां गीतेसारख्या ग्रंथाला विरोधात्मक अशा त्यांनी चार सहा ओळी कां लिहिल्या नाहींत? एक तर हा ग्रंथ त्या वेळीं अत्यंत अप्रसिद्ध असावा. कारण शंकराचार्यापूर्वीं पन्नास वर्षें लिहिलेल्या शान्तरक्षिताच्या तत्त्वसंग्रहांत या गीतेचा उल्लेख मुळींच सांपडत नाहीं. तेव्हां शान्तरक्षितापर्यंत हा ग्रंथ अप्रसिद्ध होता असें समजण्यास हरकत नाहीं. प्रथमत: शंकराचार्यानें टीका लिहून या ग्रंथाला पुढें आणलें.

१७०. जरी या ग्रंथाची माहिती बौद्ध पंडितांना होती असे धरलें, तरी त्याच्यावर कांहीं बोलतां येणें त्यांना शक्य नव्हते. त्यांचा कर्मयोग आणि लोकसंग्रह जुने झाले होते; आणि त्यांच्या आधारें भगवद्‍गीताकाराशीं वाद करणें शक्य नव्हतें. समजा, एकाद्या बौद्ध पंडितानें या ग्रंथकाराला विचारलें असतें कीं, “काय हो, भगवंताला रणक्षेत्रांत आणून त्याच्या तोंडून तुम्ही अर्जुनाला आपल्याच कुळाचा उच्छेद करण्यासाठीं उपदेश करतां हें तुम्हाला शोभतें काय?” त्यावर गीताकारानें उत्तर दिलें असतें, “बा पंडिता, हा ग्रंथ जर मी लिहिला नसता, तर आमच्या महाराजानें युद्ध सोडून संन्यास घेतला असता; आणि मग तुमच्या विहारांना मोठमोठालीं, इनामें कोठून मिळाली असतीं? त्याच्याऐवजीं जर कोणी दुसरा शैव हूण राजा आला असता, तर तुमच्यावर उपाशी मरण्याची पाळी आली असती तेव्हां हा ग्रंथ लिहिल्याबद्दल तुम्ही माझे आभार माना.