Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 56

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- ४ -

लेनिन १९२४ सालच्या जानेवारीच्या एकविसाव्या तारखेस मरण पाला. त्या वेळीं त्याचें वय फक्त त्रेपन्न वर्षांचें होतें. सोव्हिएट काँग्रेसनें काढलेल्या जाहीरनाम्यांत त्याला जवळजवळ देव बनविण्यांत आलें होतें. सदर जाहीरनामा म्हणतो, ''लेनिनची दूरदृष्टि नि:सीम होती. बहुजनसमाजाची संघटना करण्याची त्याची बुध्दि कल्पनातीत होती. तो सर्व देशांचा, सर्व लोकांचा, सर्वकालीन व परम महान् पुढारी होता. तो नव्या मानवजातीचा प्रभु होता, जगाचा तारनहार होता.''  लेनिन महापुरुष होता यांत शंकाच नाहीं. तो अति महान् विभूतींपैकीं एक होता. पण त्यानें एक दु:खद चूक केली-हिंसेनें जागतिक क्रांति घडवून आणण्याचा यत्न केला. त्यानें झारचा जुलूम नष्ट केला; पण त्या जागीं कामगारशाहीचा जुलूम आणला. अग्नीनें अग्नि विझवितां येत नाहीं. लेनिननें व्देषाशीं लढण्याची खटपट केली. जगाची लष्करशाहीपासून सुटका करण्यासाठीं त्यानें स्वत: एक सामर्थ्यशाली लष्करी यंत्र उभें केलें. लेनिनच्या कार्यक्रमांतील मोठा दोष म्हणजे हिंसेवरील (लष्करी सामार्थ्यावरील) त्याचा विश्वास हा त्या योजनेंतील दुबळेपणा होता. तो फ्रेंच व्रंचतीचा धडा विसरला. डान्टन्, राब्सपेरी, मरात यांनींहि लेनिन व ट्रॉट्स्की यांच्याप्रमाणेंच जगाला मुक्त करण्यासाठीं प्रचंड सैन्य उभें केलें होतें. पण तें सैन्य नेपोलियनच्या हातीं पडलें व त्या सैन्यानें फ्रान्सचें स्वातंत्र्यहि अस्तास नेलें.

लष्करशाहीच्या संरक्षक पंखाखालीं खरें स्वातंत्र्य कधींहि टिकणार नाहीं,  जगणार नाहीं. मला एकादे वेळेस वाटतें कीं, लेनिननें कांहीं केलें असेल तर तें इतकेंच कीं, भावी रशियन नेपोलियनसाठीं त्यानें सैन्य निर्माण करून ठेवलें. लेनिनच्या, त्याचप्रमाणें झारच्या लष्करशाहीपासून मुक्त झाल्याविना रशिया पूर्णपणें स्वतंत्र झाला असें म्हणतो येणार नाहीं.

- ५ -

जगाला गांधींचें हृदय असलेला लेनिन, खरोखरी हवा आहे अगर लेनिनची बुध्दि असणारे गांधी हवे आहेत. कांहीं बाबतींत गांधींचें मन जुन्या काळांतील आहेसें वाटतें. त्यांची बुध्दि प्राचीन काळांत वावरत होतीसें वाटतें. विवाहितांना संततींची इच्छा नसेल तर त्यांनीं ब्रह्मचारी राहावें असें ते म्हणत. ते 'यंत्रें नकोत' असें म्हणत. तसेंच ते चरखा हातीं घ्यावयास सांगत होते  ते वेद्यकशास्त्राच्याहि विरुध्द होते. ते संन्यस्त वृत्तीचे होते. ते शेळीचें दूध व खजूर यांवर राहत. ते फळें खात. गाय हिंदुमात्रास पूज्य असल्यामुळें ते गायीचे दूधहि पीत नसत, ते हिंदु धर्मांतील अनेक रूढी मानीत. पण अशा कांहीं गोष्टी सोडून दिल्या, मानवी रंगभूमीवर गांधींसारखा दिव्य स्फूर्ति देणारा महापुरुष क्वचितच झाला असेल असें आपणांस नि:शंकपणें व नि:पक्षपातीपणानें म्हणावें आलेल. जगांत होऊन गेलेल्या अत्यंत प्रभावी व स्फूर्तिदायी व्यक्तींपैकीं गांधी एक होत.

गांधींना महात्मा म्हणतात. महात्मा म्हणजे ज्याचा आत्मा मोठा आहे तो, ज्याचें मन मोठें आहे असा महापुरुष. गांधी केवळ शान्तात्मे होते असें कित्येक म्हणत, पण तें केवळ असत्य आहे. सीझरला ज्याप्रमाणें शांततावादी म्हणतां येणार नाहीं, त्याचप्रमाणें गांधींनाहि शांततावादी म्हणता येणार नाहीं. गांधी हे त्यांच्या कालीं जिवंत असणार्‍यांत अत्यंत जोरदार लढवय्ये होते. खरोखरच त्यांना 'इतिहासांतील सर्वांत मोठी विभूति' असें म्हणावें लागेल. असा युध्दशास्त्रज्ञ पूर्वी कधीं झाला नाहीं. गांधींनीं जें नवें शस्त्र शोधिलें आहे, त्याच्याशीं तुलना करून पाहतां तुमच्या या पाणबुड्या, तुमचीं हीं झेपेलिनें, तुमचीं हीं आरमारें, तुमच्या या तोफा म्हणजे लहान मुलांचीं खेळणीं वाटतात. गांधींनीं शोधलेलें हें कोणतें शस्त्र? - अहिंसेचें सर्वशक्तिच्मान् शस्त्र. रक्तपाताशिवाय लढाया कशा जिंकाव्या हें गांधींनी शिकविले आहे.

« PreviousChapter ListNext »