Bookstruck

प्रकरण ३ : शोध 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हिंदुस्थान किंवा इतर कोणताही देश यांना मानवी गुणधर्म कल्पून पाहण्याची वृत्ती अर्थात खुळेपणाची आहे.  देश म्हणजे हातपाय असलेली एखादी व्यक्ती नव्हे.  मी तरी असली कल्पना कधी केली नाही, अशा स्वरूपात भारताकडे कधी पाहिले नाही.  भारतीय जीवनातील विविधता, शेकडो भेद, नाना वर्ग, जातिजमाती, धर्म, वंश, सांस्कृतिक विकासाच्या निरनिराळ्या पातळ्या या सर्वांची मला स्पष्ट जाणीव असे.  परंतु मला असे वाटते की ज्या देशाला अखंड अशी सांस्कृतिक परंपरा आहे, अशा दीर्घ परंपरेची ज्याला पार्श्वभूमी आहे, ज्या देशातील लोकांची जीवनाकडे पाहण्याची एक समान दृष्टी आहे, त्या देशाचे विशिष्ट काही अंतरंग निर्माण होत असते, आणि त्या अंतरंगाचा त्याच्या सर्व संतानांवर ठसा उमटत असतो.  त्यांचे आपसात मग कितीही मतभेत असोत, परंतु राष्ट्राच्या विशिष्ट वृत्तीचा स्पष्ट ठसा त्यांच्यावर उमटल्याशिवाय राहात नाही.  तुम्ही चीनमध्ये जाऊन पाहा, तेथील सनातनी मांठेरिन पंडित बघा, किंवा भूतकाळाशी संबंध असलेला संबंध तोडून उभा राहिलेला कम्युनिस्ट बघा.  त्यांच्यावर एकच चिनी छाप तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही.  तसेच भारताच्या अंतरंगाचेही आहे.  या भारतीय अंतरंगाचा मी शोध करीत होतो. केवळ जिज्ञासा म्हणूनही हे संशोधन करीत नव्हतो.  जिज्ञासा नव्हती असे नाही.  परंतु माझा देश, माझे देशबांधव यांचे वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी एखादी किल्ली या संशोधनातून मला मिळेल असे वाटत असल्यामुळे त्या शोधास मी प्रवृत्त झालो होतो.  माझ्या विचाराला आणि कृतीला त्या संशोधनातून मार्गदर्शन होईल या इच्छेने मी या शोधाला निघालो होतो.  राजकारण आणि निवडणुकी यांना त्या त्या क्षणापुरते महत्त्व असते.  क्षुद्र गोष्टींवरच आपण जेव्हा भर देऊ लागतो तेव्हा अशा गोष्टींना भाव येतो.  परंतु भारताच्या भविष्यकालीन मंदिराची जर आपणांस भक्कम पायावर अभंग, सुरक्षित व सुंदर उभारणी करायची असेल, तर आपणांस पाया चांगला खोल खणला पाहिजे.

« PreviousChapter ListNext »