Bookstruck

हरिजन यात्रा 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘ईश्वरी अंश सर्वत्र आहे. हरिजन का वाईट आहेत? ते श्रमाने भाकर मिळवितात. जो श्रमाने भाकर मिळवितो तो सर्वांत पुण्यवान. हरिजनांमध्ये श्रद्धा आहे, भक्ती आहे, प्रामाणिकपणा आहे. त्यांना जवळ घ्या.’

‘ऊस वाकडा असला तरी आतील रस गोड असतो. धनुष्य वाकडे असले तरी बाण सरळ जातो. चोखामेळा, तो थोर हरिजन साधू, त्याने अभंगात नाही का म्हटले :

ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया सोंगा।।

म्हण ग सरोजा तो अभंग.’

सरोजाने तो अभंग गोड आवाजात म्हटला. परिणाम विलक्षण झाला. शेवटी सरोजाने सर्वांना हात जोडून प्रार्थना केली, ‘हरिजनांना जवळ घ्या. म्हणजे देव जवळ येईल. स्वातंत्र्य जवळ येईल!’

तिची ती उत्कट प्रार्थना ऐकून लोक सद्गदित झाले.

असा प्रचार चालला होता.

एका गावी मुक्काम असताना रामराव वर्तमानपत्रे वाचीत होते. तो, एका वर्तमानपत्रात त्यांनी एक जाहिरात वाचली. ते आश्चर्यचकित झाले.

‘सरोजा, सरोजा.’

‘काय बाबा?’

‘अग तुला देवाने एकदम लक्षाधीश केले आहे. देव तुझ्यावर प्रसन्न झाला आहे. ही बघ जाहिरात. तुला नाही सारे समजणार. आत आपल्याला परत गेले पाहिजे.’

‘आपण असे फिरतच राहू.’

‘किती दिवस फिरशील अशी?’

‘तुम्ही बरोबर असलेत म्हणजे नेहमी फिरेन.’

‘आणि आईला नाही का भेटायचे?’

« PreviousChapter ListNext »