Bookstruck

संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१९३० मध्ये आम्ही मुंबई प्रांतातले राजबंदी त्रिचनापल्लीला पाठवले गेलो. सायंकाळी प्रार्थना झाल्यावर कोणी काही लिहून वाची. व्यंकटाचम् म्हणून मुंबईचा एक राजबंदी माझा मित्र झाला होता. मी त्याला इंग्रजीत काही लिही, मी मराठीत अनुवादून वाचीन, असे सांगितले. त्याची भाषा मल्याळी. त्याने ''मलबारकडचा एक दिवस'' म्हणून लेख लिहिला. मी त्याचे भाषांतर करून वाचले.

''सकाळी बायका उठतात, चूल सारवतात, सडांसमार्जन करतात. मग कॉफी होते. आजीबाई भाजी चिरते. आजोबा पूजेला बसतात. सुना तळयावर धुणी घेऊन जातात...'' असे ते वर्णन होते. ऐकल्यावर महाराष्ट्रीय मित्र म्हणाले, ''आपल्याकडच्यासारखेच आहे.'' मी म्हटले, ''भारताचे हृदय एकच आहे.''

तेलगू भाषेत आपल्या ''शारदा'' नाटकासारखे नाटक आहे. तेच प्रश्न, त्याच सामाजिक समस्या. हुंडे. स्पृश्यांस्पृश्यतेचे प्रकार. म्हणून मी म्हणतो की, भारतीय संस्कृती एक आहे; प्राताप्रांताच्या विशेष अलग अशा नाहीत.

परंतु एकदा कोठे शुध्दीच्या नावावर हकालपट्टी सुरू झाली म्हणजे ती कोठे थांबेल ते सांगता येणार नाही. मराठीतून उर्दू शब्द हाकला चळवळ सुरू झाली. नाना शब्दांच्या नाना छटा असतात. आकाश शब्द नि अस्मान शब्द आपण एकत्र नाही घालणार, परंतु विविक्षित छटा दाखवायला अस्मान शब्द सुंदर वाटतो. सार्‍या  जगातून घ्यावे, पचवावे अन् बलवान व्हावे. इंग्रजी कोषात, राजा, सरदार, जंगल इत्यादी शब्द आढळतील. शेकडो ठिकाणचे त्यांनी शब्द घेतले. भाषाशुद्धीची चळवळ आणि प्रांत शुद्धीची चळवळ, हिंदुना मुसलमानांना हाकलावे, मुसलमानांनी हिंदु-शिखांना हाकलावे, एकमेकांची घाण जणू दूर काढावी असे प्रकार सुरू झाले; परंतु मुसलमानांनी हिंदू-शिखांना आणि हिंदू-शिखांनी मुसलमानांना हाकल्यानंतर पुढे काय?

हाकलावयाची तर गोडी वाटू लागली. मग बंगाल्याने बिहार्‍याला चले जाव म्हणावे, बिहारीने बंगालीला, तामीळ बंधूने तेलगू बंधूस, तेलगू बंधूने तामीळ बंधूस, कानडी बंधूने महाराष्ट्रीयांस, महाराष्ट्रीयांनी गुजराथीयांस- असे का एकमेकांना खो देत राहावयाचे? आज हे प्रकार सुरू होत आहेत. श्री. जयप्रकाश मद्रासच्या दौर्‍यावर असताना आम्हांला स्वतंत्र द्रविडीस्थान द्या, आर्यांनी आमचा नाश केला, आर्य भाषेतील शब्द काढून टाका, अशा चाललेल्या चळवळी त्यांनी पाहिल्या. त्यांना दुःख झाले. कोठे आहे भारत? प्रत्येक प्रांत का सर्वतंत्र स्वतंत्र होणार? हे असहिष्णु प्रकार कोण थांबवणार? आपणच याला आळा घालू या.

« PreviousChapter ListNext »