Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || एक || 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा अंहलठ्ठिक  येथील सार्वजनिक सभागृहात बुद्धदेव शिरले, तो तेथे त्यांचे शिष्य एका ब्राह्मणाविषयी बोलत होते. त्या ब्राह्मणाने बुद्धांवर अधार्मिकतेचा आरोप केला होता. त्यातील दोष दाखविले होते. शिष्यांचे बोलणे ऐकून बुद्ध म्हणाले, “बंधूंनो, दुसरे माझ्याविरुद्ध बोलतात, माझ्या धर्माविरुद्ध किंवा संघाविरुद्ध बोलतात, म्हणून तुम्हाला रागवण्याचे काहीच कारण नाही जर तुम्ही रुसाल, रागवाल तर आध्यात्मिकदृष्ट्या तुमची हानी होण्याचा संभव आहे; आणि तुम्ही जर संतापाल, चिडून जाल, तर ते लोक जे म्हणत आहेत ते कितपत यथार्थ वा अयथार्थ आहे, याचाही निर्णय करायली तुम्ही अक्षम ठराल.” आज २,५०० वर्षे झाली तरीही, अडीच हजार वर्षांच्या ज्ञानप्रकाशानंतरही बुद्धदेवांचे हे शब्द, हे थोर विचार किती उन्नत व उदात्त वाटतात! आपले पूर्वग्रह दुखावले गेले किंवा प्रशंसिले गेले एवढ्यावरुन धर्मतत्त्वांची,
___________________________
*आत्तदीप, आत्तसरण, अनन्नसरण; धम्मदीप, धम्मसरण.
-महापरिनिब्बाणसूत्त : ३३


मतांची सत्यासत्यता ठरवायची नसते. अशा स्तुती-निंदांवरुन तत्त्वे सत्य की चुकीची ठरवायचे नसते. कितीही विचित्र व चमत्कारिक अशी असत्ये कोणी मांडली, स्वत:च्या मताविरुद्ध दुस-याचे मत कितीही पराकोटीस गेलेले असले, तरी त्या सर्वांचा विचार करायला बुद्ध सिद्ध असत. त्या सर्वांचा परामर्श घ्यायला ते भीत नसत. त्यांच्या काळात सर्वत्र गोंधळ माजलेला होता. मतमतांतरांचा गलबला होता. अशा काळात सर्व मतांची छाननी करण्यास सिद्ध असणे हाच एक उपाय होता. भ्रमनिरसनार्थ व सत्याची प्राप्ती व्हावी म्हणून हाच एक मार्ग होता. लोकांनी आपले जीवन बुद्धांच्या पायावर उभारावे म्हणून त्यांना साहाय्य देण्याचा हाच एक दृढ पंथ होता. इतर पंथांवर कोणी अयोग्य टीका केली, तर बुद्धांस खपत नसे. ते एकदा म्हणाले, “हे आकाशावर थुंकण्यासारखे आहे. तुमच्या थुंकीने आकाश तर नाहीच मळणार; ती थुंकी मात्र थुंकणा-याकडे परत येऊन त्याला घाणेरडे करील.”

« PreviousChapter ListNext »