Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || दोन || 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मनुष्याचे आंतरिक जीवन म्हणजे वासना, विचार, रागद्वेष यांची एक अखंड परंपरा. या सर्वांना एकत्र राखणारा हा शरीराचा बंध जेव्हा मरणसमयी गळून पडतो, तेव्हा अदृष्य अशा शक्ती एक नवीन व्यक्ती सृजितात. ही व्यक्ती मनोमय असते जणू व मृतात्म्याचे जीवन पुढे चालवते. त्या पूर्वपुरुषाने जे काही बरेवाईट केले असेल, त्याची कटु वा मधु फळे भोगवयास ही लिंगदेहात्मक व्यक्ती उभी राहते. या व्यक्तीला वासनात्मक पुरुष म्हणा वाटले तर. या दृष्य व्यक्तीला बनिणा-या सर्व अंर्तबाह्य अणुरेणूंत सारखा बदल होत असतो. परंतु बदल होत असला तरी त्यांचा नि:शेष नाश होत नाही. जोपर्यंत त्यांना सर्वत्र एकत्र ठेवणारी शक्ती नष्ट होत नाही, पुन्हा जन्मास यावे असे वाटणारी वृत्ती जोपर्यंत नष्ट होत नाही, जोपर्यंत जीवनाची असोशी आहे, पुन्हा स्वतंत्र अस्तित्व असावे अशी जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत व्यक्तीला बनविणा-या घटकांत बदल होत असला तरी त्यांचा संपूर्ण नाश होत नाही.

जर शाश्वत, अविचल असा आत्मा नसेल, तर अनात्म्याने केलेल्या कर्मांचा कोणावर परिणाम होतो? बुद्धांचे उत्तर असे, की ‘जो वासनांचा दास आहे, तो मनाच्या पलिकडे कसा जाईल?’ बुद्धधर्माच्या आरंभीच्या पुस्तकांतून या अडचणींचा नीट उलगडा केलेला दिसत नाही. एकच उत्तर देण्यात येते, की मानसिक अखंडता असते. ज्याला आत्म्याचा स्वभाव समजला आहे, अनेक जन्मांतून हा जीवात्मा चालला आहे हे जो समजून आहे, त्याला कोणताही एक जन्म, जरी त्या जन्माचे परिणाम पुढील भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असेल, तरी फारसा महत्त्वाचा वाटणार नाही.

३) अज्ञानाचा निरास होण्यासाठी कठोर नीती आवश्यक आहे. शील व प्रज्ञा यांचा अविभाज्य संयोग आहे. सदाचार व सहदस्फूर्त अंतदृष्टी यांचे कधी न तुटणारे ऐक्य आहे. परंपरा स्मृती, विधिनिषेध, रूढी, नीतिनियम, इत्यादींविषयी बुद्ध कधी बोलत नाहीत. सुखी होण्याचा मार्ग म्हणजे हृदय मांगल्याने भरून ठेवणे ज्याच्याजवळ मंगल हृदय आहे आणि सत्कर्माच्या रूपाने प्रकट होणारे मन आहे, त्याच्याजवळ सुखाचा मार्ग आहे. मनाचे मांगल्य, विचारांतील व आचारांतील निर्मळ, निर्भेळ असे शिवत्व, हा बुद्धांच्या धर्माचा पाया आहे. बुद्धकल्पित परिपूर्ण, अव्यंग जीवनात देवदेवतांची अडगळ नाही; बाहेरच्या शक्तीशी संबंध नाही. तुमचे बरेवाईट तुमच्या स्वाधीन आहे असे ते सांगतात. ते शिष्यांना अनेकदा पुढील उपदेश देताना आढळतात, ‘शिष्यांनो, इकडे या. दु:ख दूर व्हायला हवे असेल, तर पवित्र जीवन जगा.’

« PreviousChapter ListNext »