Bookstruck

उपरिचर वसूची कथा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
उपरिचर नावाचा एक धर्मशील राजा होऊन गेला. आपल्या उग्र तपश्चर्येने हा एक दिवस इंद्रपदाला योग्य होईल या भीतीने देवांनी त्याला तपश्चर्येपासून परावृत्त केले. इंद्राने त्याला, ’तूं पृथ्वीवर नित्य तत्पर राहून धर्मपालन व धर्माचा प्रतिपाळ कर, चेदि देश जिंकून तूं त्याचा राजा हो’ असे सांगितले. आपलें स्फटिकाचे गगनविहारी विमान त्याला दिले व वैजयंती माळ दिली. आपली नित्य आठवण रहावी म्हणून सज्जनाम्चा प्रतिपाळ करणारी एक कळकाची काठी त्याला दिली. इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी उपरिचर राजाने ती काठी जमिनीत रोवली व तिची पूजा केली. दुसरे दिवशी या काठीवर शेल्यासारखे एक वस्त्र बांधीत व तिची पूजा करीत. ही काठीची पूजा म्हणजे इंद्राचीच पूजा होय.
या कथेतील रूपके मला उलगडली नाहीत पण यांत गुढीपाडव्याच्या प्रथेचे मूळ स्पष्ट दिसते. मात्र आजकाल गुढीपाडव्याच्या प्रथेच्या या मूळ कथेचे स्मरण फारसे कोणाला नाही! गुढीला आपण शालिवाहनाच्या विजयाचे प्रतीक मानतो. इंद्रपूजा मानत नाही.
व्यासांची माता सत्यवती ही या उपरिचर वसूची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होय. महाभारतात सत्यवती ही धीवरांना मत्स्यीच्या पोटांत मिळाली व त्यांनी तिला राजा उपरिचराकडे नेऊन दिले असे म्हटले आहे. मत्स्यीच्या पोटात एक बालकही मिळाला होता. मात्र राजाने मुलाला ठेवून घेतले व कन्येला धीवरालाच देऊन ’तूंच हिचा सांभाळ कर’ असे सांगितले! पुत्र पुढे मत्स्य देशाचा राजा झाला. ती मत्स्यी एक शापित अप्सरा होती असे महाभारत म्हणते व ती उपरिचराच्या वीर्यापासून गर्भवती झाली असेंहि म्हणतें! याचा सरळ अर्थ धीवर स्त्रीला राजापासून हीं दोन अपत्ये झाली असाच घेतला पाहिजे. राजाने कन्येला कां स्वीकारले नाही याबद्दल महाभारत गप्प आहे. राजा जनकाने व द्रुपदाने शेतात व यज्ञात मिळालेल्या (कोणापासून झालेल्या?) कन्या सीता व द्रौपदी यांचा स्वीकार केला व त्याना राजकन्या म्हणूनच वाढवले हे विषेश! ते भाग्य सत्यवतीला मिळाले नाही.
« PreviousChapter ListNext »