Bookstruck

नलदमयंती कथा - भाग २

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
बृहदश्वाने ही कथा युधिष्ठिराला कां ऐकविली याचे कारण असे कीं बृहदश्वापाशी युधिष्ठिराने गार्‍हाणे गाइले की ’फासे खेळण्यात पटाईत असलेल्या धूर्त जुगार्‍यांनी मला बोलावून माझे सर्व धन व राज्य हरण केले, मी अत्यंत दु:खी होऊन कष्टाने वनवास भोगीत आहे. माझ्या दु:खाने पीडित झालेल्या मित्रांचीं संतापजनक भाषणे माझ्या हृदयात आहेत. अस्त्रविद्या मिळवण्यासाठी मी अर्जुनाला दूर पाठवले आहे पण त्याच्या विरहाने आम्ही हवालदिल आहोत. माझ्यासारखा दुसरा कोणी भाग्यहीन राजा या पृथ्वीवर असेल काय? आपण अशा कोणाला पाहिले आहे काय? माझ्यापेक्षा दु:खी दुसरा कोणी नसेल.’
त्यावर बृहदश्वाने म्हटले कीं ’तुला वाटते तसे नाहीं. तुझ्याहूनहि भाग्यहीन आणि दु:खी राजाची कथा तुला सांगतो. निषध देशाच्या वीरसेन राजाचा पुत्र नला, जो धर्मार्थवेत्ता होता, तो बंधु पुष्कराकडून द्यूतांत जिंकला गेला आणि त्याने पत्नीसह वनवासाचे दु:ख भोगले. त्याच्या बरोबर सेवक, रथ, बंधुबांधव नव्हते. त्याच्याजवळ यापैकीं कांहींच राहिले नव्हते. तूं तर वीरबंधूंनी युक्त असून श्रेष्ठ व विद्वान ब्राह्मणांनीहि वेढलेला आहेस तेव्हां तूं शोक करणे योग्य नाहीं’
आपली विपत्ति ज्यालात्याला असह्य वाटते पण आपल्याहूनहि अधिक विपत्ति भोगलेले व भोगत असलेले अनेक असतातच त्यांचेकडे पाहून विवेकाचा आश्रय करणे हेच उचित हे चिरंतन सत्य येथे या संवादानिमित्ताने समॊर मांडलेले आहे. महाभारतात असा वैचारिक अनुभव जागोजागीं येतो. त्यासाठी श्रद्धेवांचून अडत नाहीं.
« PreviousChapter ListNext »