Bookstruck

नलदमयंतीकथा भाग ६

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
विवाहानंतर सर्व राजे आणि देवहि परत निघाले. देवांना वाटेत ’कलि आणि द्वापर’ असे दोघे भेटले. हे देव वा मानव कोणीच नव्हते. या कोणी दैवी शक्ति होत्या. मात्र देवांना टाकून दमयंतीने मानव नलाला वरिलें याचे कलीला वैषम्य वाटलें व त्याने जाहीर केले कीं मी नलाला धडा शिकवीन. पुढे नल-दमयंतीवर जी अनर्थपरंपरा कोसळली त्याचे कारण खरेतर नलाचे आत्यंतिक द्यूतप्रेम होते पण त्या जबाबदारीतून त्याला मुक्त करण्यासाठी ’तो सर्व कलीचा प्रभाव होता’ असे त्याचे कारण दर्शविले गेले आहे. ’कलीचा प्रभाव’ म्हणजे काही काळपर्यंत स्वत:ची विवेकबुद्धि हरवून बसणे एवढेच म्हणावयाचे.
नलदमयंतीचा संसार सुखाने चालला होता. त्याना दोन मुले झालीं. बराच काळ पर्यंत ’कली’ला आपला बेत साध्य करतां आला नाही. पण अखेर काळ नलाला प्रतिकूल झाला अन मग कलीने दावा साधला. नलाचा एक भाऊ होता. त्याचे नाव पुष्कर. तो नलाच्या राज्यात राहत होता असे म्हटलेले नाही. त्याचा व नलाचा काही झगडा झाला होता वा नलाने त्याचा अपमान करून त्याला राज्यातून हाकलून दिले होते असे म्हटलेले नाही आणि पुष्कराचे वेगळे राज्य होते असेहि म्हटलेले नाही. मग या पुष्कराने नलाशी वैर कां धरावें? ’कलीचा प्रभाव!’ एक दिवस अचानक हा पुष्कर नलाकडे आला आणि त्याने नलाला द्यूताचे आव्हान दिले. ते नलाने राजेलोकांच्या स्वभावाप्रमाणे स्वीकारले आणि मग ’कलीच्या प्रभावामुळे’ नलाची विवेकबुद्धि त्याला सोडून गेली. तो बेभानपणे द्यूताच्या संपूर्ण आहारीं गेला अन मग अनर्थपरंपरा सुरू झाली.
« PreviousChapter ListNext »