Bookstruck

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ४

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
विचित्रवीर्याने दोन्ही भार्यांसह संसारसुख काही वर्षे उपभोगले. मात्र त्याला अपत्य झाले नाही. त्याच्यात काय दोष होता ते महाभारतात सांगितलेले नाही. विचित्रवीर्य या नावावरून तर्क करावा. ऐन तारुण्यातच तो मरून गेला. शांतनूने ज्या हेतूने सत्यवतीशी विवाह केला तो वंशवृद्धीचा हेतु निष्फळ ठरला. वंश टिकवण्यासाठी सत्यवतीने भीष्माला त्याच्या प्रतिज्ञेतून मुक्त करून ’तूं विवाह कर’ असे सुचवले ते त्याने अर्थातच नाकारले. ’वडील दीर या नात्याने अंबालिका, अंबिका यांना तूं अपत्य मिळवून दे’ असे विनवले तेहि नाकारले. मात्र वंश टिकवण्यासाठी पूर्वीं, परशुरामाने क्षत्रिय घराणीं नामशेष केलीं होतीं तेव्हां, अनेक क्षत्रिय स्त्रियांनी श्रेष्ठ ब्राह्मणांपासून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घेऊन वंशविस्तार केला, याचा दाखला देऊन, अंबालिका व अंबिका यांनीहि तसेंच करावे असें सुचवलें. तेव्हां सत्यवतीने आपल्याला ऋषि पराशरापासून झालेल्या व्यास या पुत्राचे नाव नियोगासाठी सुचवले ते भीष्मानेहि मान्य केले. यावेळीं कुरुकुळांतीलच दुसर्‍या कोणा पुरुषाचा विचार दोघांनीहि कां केला नाही हे एक कोडेच आहे. ज्या बाल्हीकाचे नाव वरचेवर येते, त्याच्या वंशातला कोणी योग्य पुरुष कसा सुचला नाहीं? (बाल्हीक सोमदत्त व त्याचा पुत्र भूरिश्रवा याचे नाव पुढे कथेत अनेकदां येते. भूरिश्रवा साधारण कौरव-पांडवांचा समवयस्कच दिसतो तेव्हां सोमदत्त वा त्याचा पिता हा नियोगासाठी कदाचित योग्य वयाचा ठरला असता!)
सासूची सूचना दोन्ही सुनांनी अनिच्छेनेच मान्य केली असणार कारण व्यासाचे ओंगळ ऋषिरूप. खुद्द व्यासालाहि त्याची जाणीव होतीच. व्यासाला शुक नावाचा एक पुत्र होता तेव्हां सत्यवतीने विनवले तरीहि या भानगडीत आपण पडूं नये असें व्यासाला कां वाटलें नाहीं? अंबालिका व अंबिका दोघीनाहि जन्मदोष असलेले पुत्र झाले. त्याचें दिलेले कारण (अंबालिकेने डोळे मिटून घेणे व अंबिकेने भीतीने पांढरीफटक पडणे) निव्वळ हास्यास्पद आहे. इच्छेविरुद्ध (उदा. बलात्काराने) मातृत्व लादले गेले तरीदेखील स्त्रीला अनेकदां सुदृढ अपत्य होतें! येथे तर मातृत्व हवेच होते! जणू व्यासावर पुत्रांच्या व्यंगांचा दोष नको म्हणून तो त्या दोघींवर ढकललेला वाटतो! मात्र धृतराष्ट्र आंधळा निपजल्यावर तरी व्यासाचा नाद सोडून देऊन दुसरा कोणी शोधावा असें सत्यवतीला वाटले नाही वा भीष्मालाहि सुचले नाही. यांतहि भीष्माचा अति अलिप्तपणाच जाणवतो. तिसरा प्रयोग अंबालिका-अंबिका यांनी युक्तीने टाळला. आपल्या जागीं दासीलाच पाठवले! व्यासांना कळले होतेच कीं यावेळी आपल्यासमोर दासी आली आहे पण व्यासानी सत्यवती वा भीष्माकडे तक्रार केली नाही वा माघार घेतली नाही! दासीचे पोटीं विदुर जन्माला आला.
« PreviousChapter ListNext »