Bookstruck

रामायण बालकांड - भाग ४

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
दशरथाच्या यज्ञाला राजा जनक ’जुना संबंधी’ या नात्याने आला होता. म्हणजे दोन्ही कुळांचा राम-सीता विवाहापूर्वींहि संबंध होता असे दिसते. कैकय राजा, कैकेयीचा पिता, हाहि उपस्थित होता. कौसल्या वा सुमित्रा यांच्या माहेरच्या कुळांचा उलेख नाही. कौसल्या, तिच्या नावावरून कोसल देशाची राजकन्या असावी असे म्हणता येईल. सुमित्रा कोठली याचा मात्र खुलासा कोठेच नाही. दशरथाने तिच्याशी विवाह सौंदर्यामुळे वा पुत्रप्राप्तीसाठी केला असावा.
यज्ञीय अश्व एक वर्षानंतर परत आला. अश्वाबरोबर दशरथ स्वत: ससैन्य गेलेला नव्हता. मुलगे नव्हतेच तेव्हा प्रश्नच नव्हता. मात्र कोणाबरोबरहि युद्धप्रसंग उद्भवला नाही. दशरथाबद्दल इतर राजाना आदर असावा. यानंतर यज्ञाचे खुलासेवार वर्णन आहे. अनेक पशूंचे बळी दिले गेले. अश्व्मेधातील एक विचित्र प्रथा म्हणजे यज्ञाचे शेवटी अश्वाशेजारी राणीने एक रात्र शयन करणे! या प्रथेचा उल्लेख महाभारतातहि द्रुपदाच्या यज्ञाच्या संदर्भात आहे. यामागे काय तत्व असावे हे कळत नाहीं. यानंतर त्याच अश्वाचा यज्ञात बळी देऊन यज्ञ समाप्त झाला. ऋष्यशृंगाने राजाला ’तुला चार पुत्र होतील’ असा आशीर्वाद दिला. दशरथाला एकहि पुरला असता! एकच मिळाला असता तर राम वनात गेलाच नसता व रामायणच झाले नसते! येथे दशरथाच्या वैश्य व शूद्र स्त्रियांचा उल्लेख आहे. त्यानंतर पुत्रेष्टि हा स्वतंत्र यज्ञ अथर्ववेदाच्या मंत्रांनी केला गेला. पुत्रप्राप्तीसाठी करावयाचा हा यज्ञ बहुधा गौण मानला जात असावा म्हणून वसिष्ठांनी स्वत: न करता ऋश्यशृंगाला बोलावले. अश्वमेधाचे निमित्तने दशरथाने त्याला अपार धन दिले व मग त्याने पुत्रेष्टि यज्ञ करून दिला असा प्रकार दिसतो!
यज्ञात प्रजापतिलोकांतील पुरुष प्रगट झाला व त्याने क्षीरपात्र दशरथाला देऊन ’ही खीर तुझ्या योग्य त्या पत्नीला दे’ असें म्हटले. खिरीची वांटणी करताना, दशरथाने अर्धी कौसल्येला, पाव सुमित्रेला व अष्टमांश कैकेयीला दिली व उरलेली अष्टमांश, काही विचार करून पुन्हा सुमित्रेलाच दिली. असा कोणता विचार त्याने केला असेल बरे?
खिरीची वांटणी करताना दशरथाने राण्यांच्या सीनियॉरिटीला प्राधान्य दिलेले दिसते. यज्ञाला कैकय राजा उपस्थित होता. खिरीच्या वांटणीत आपल्या मुलीला फक्त अष्ट्मांश वाटा मिळाला याबद्दल त्याने राग वा तक्रार केलेली नाही! खुद्द कैकेयीनेहि तक्रार केली नाही. यामुळे ती दुष्ट वा मत्सरी होती या समजुतीला आधार दिसत नाही. मला तर ती भोळी-भाबडी वाटते!
« PreviousChapter ListNext »