Bookstruck

अयोध्याकांड - भाग १

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
रामायणाच्या बालकांडातील कथाभागाबद्दल अद्यापपर्यंत लिहून झाले. या लेखापासून आता अयोध्याकांडाचा परामर्ष घ्यावयाचा आहे. बालकांडाचे अखेरीस, राम, त्याचे बंधू, त्यांच्या नवीन वधू व सर्व कुटूंब अयोध्येला परत आले व लगेचच भरत व शत्रुघ्न केकय देशाला गेले असे म्हटले आहे. अयोध्याकाडाचा कथाभाग येथून पुढे सुरू होतो. मध्यंतरी किती काळ गेला याचा स्पष्ट उल्लेख रामायणात नाही. ७-८ वर्षे तरी गेलीं असावीं असा तर्क करावा लागतो. या तर्काला आधार, पुढे एका ठिकाणी कौसल्येच्या तोंडी आलेला एक उल्लेख व नंतर अरण्यकांडात सीताहरण प्रसंगी रावण व सीता यांच्यातील संवाद हे आहेत. त्याबद्दल त्या त्या प्रसंगी पुन्हा खुलासा करणार आहे. भरत-शत्रुघ्न केकय देशाहून दीर्घकाळ परत आले नाहीत. स्पष्ट उल्लेख नसला तरी केव्हातरी त्यांच्या बायकांचीहि रवानगी तिकडे झाली असावी. हे दोघे केकय देशाला एवढा दीर्घकाळ कां राहिले असावे याचे काहीहि कारण रामायणात मिळत नाही.
राज्यकारभार संभाळण्याचा कंटाळा येऊन, आपण जिवंत असतानाच राम सत्तेवर यावा असे दशरथाला वाटू लागले व त्याने मंत्र्यांबरोबर सल्लामसलत करून रामाला युवराज बनवण्याचा निश्चय केला. वेगवेगळ्या देशांतील पुरुष व राजे यांना विचारविनिमयासाठी आमंत्रित केले. मात्र, घाईमुळे राजा जनकाला व केकयराजाला बोलावले नाहीं. अशी कोणती घाई होती बरें? कैकय्रराज्य बहुधा दूर असावे पण जनक तर जवळच होता. मग दोघांना कां टाळले? हें एक शंकास्थळ आहे. योजलेल्या बेतात विघ्न येण्याची तर दशरथाला शंका नव्हती ना? कोणाकडून विघ्न येणार होते? पुढील भागांत याचा विचार करूं.
Chapter ListNext »