Bookstruck

पुरस्कार दिला वृद्धाला! का?

कानरचे जमीनदार भूपतिराय यांनी आपल्या जन्म-दिवशी एका साहित्य-गोष्ठीचे आयोजन केले. परमशिवावर जो लागोपाठ शंभर कविता ऐकवील, त्याला 'सरस्वती-पुत्र' ही पदवी व हजार अशर्फ्या दिल्या जातील अशी त्यांनी घोषणा केली. या स्पर्धेत रजनीचंद्र नावाचा एक पंचवीस वर्षांचा तरुण व नारायण शर्मा नावाचे एक ऐंशी वर्षांचे वृद्ध समान प्रतिभाशाली सिद्ध झाले. आता महाराज कोणाला विजयी ठरवणार याबाबत सभेतील सर्वांना उत्सुकता लागून राहिली. जमीनदाराने विचारान्ती नारायण शर्माला विजेता ठरविले. त्यांना पदवी देण्यात आली आणि बरोबर एक हजार अशर्फ्या पण. समारंभ संपल्यावर दिवाणाने जमीनदाराला विचारले- "महाराज, आपण नारायण शर्मांना विजेता ठरवलंत? याच्यामागे काही खास कारण?" जमीनदाराने लगेच उत्तर दिले- "होय तर! दिवाणजी, रजनीचंद्र तरुण आहे. या वर्षी नाही तर पुढील वर्षी तो स्पर्धेत पुन्हा भाग घेईल आणि पदवी व पुरस्कार मिळवू शकेल. बिचारा नारायण शर्मा म्हणजे पिकलं पान! केव्हा गळून पडेल सांगता येत नाही. आम्ही नारायण शर्मांचा सत्कार नाही केला, तर त्यांचा सत्कार करण्याचं सद्भाग्य मिळालं नसतं. अशा भाग्यापासून कदाचित आम्ही वंचित राहिलो असतो! -आर्. पद्मनि"