All Marathi Stories
मागसलेला विद्यार्थी
परब्रह्मस्वामी सकलशास्त्रात पारंगत होते. दरवर्षी काही विद्यार्थ्यांना ते शिकवत असत, पण कोणत्याही शिष्याला एक वर्षापेक्षा अधिक ते आपल्याजवळ ठेवत नसत.
शिष्य गणनाथने स्वामींजवळ राहून शिक्षण घेतले. पण त्याला असे आश्चर्य वाटत होते की, आपल्याला अजूनही ज्ञात नसलेले अनेक विषय या जगात आहेत! त्याला परब्रह्मस्वामींनी समजावून सांगितले की, "बेटा, मला जितकं काही माहीत आहे, त्यातलंच फारसं थोडं मी तुला शिकवलं आहे. राहता राहिली माझ्या स्वतःच्या ज्ञानाची गोष्ट. पण ते तर ज्ञान-समुद्रतल्या एका थेंबाइतकंच आहे."
त्यावर्षी या गणनाथसह एकूण दहा शिष्य परब्रह्मस्वामींजवळ शिकत होते. स्वामींनी सर्वांना एकत्रच शिकवले. परंतु कुश नावाच्या शिष्याला मात्र त्यांनी सर्वांपासून निराळे ठेवले. नसू शिष्यांना ते दिवसातून चार तास शिकवत, तर एकट्या कुशला मात्र ते आठ तास देत. गुरुचा हा 'सवता सुभा' इतरांना आवडला नाही. एके दिवशी सर्वांनी मिळून त्यांना याचे कारण विचारले.
"शिष्याला किती शिकवायचं, ते मी त्याच्या सामर्थ्यावरून ठरवतो." गुरुंच्या या उत्तरापुढे सर्वजण निरुत्तर झाले. काही काळाने त्यांचा आश्रम सोडायचा दिवसही जवळ आला.
परब्रह्मस्वामींनी आपल्या शिष्यांसमोर दहा बीजे ठेवली. ते गणनाथला म्हणाले, "ही बीजे आपल्या हातात एकत्र खुळखुळव. सगळी नीट मिसळून नंतर एक-एक करून सर्वांना वाटून टाक." तसे केल्यावर ते पुन्हा म्हणाले, "गणनाथने तुम्हाला एक-एक बी दिली आहे. मी त्यांना हातही लावलेला नाही. घरी गेलात की आपापल्या परसात आपल्याला मिळालेलं बी पेरा, पाणी देत राहा. एक महिन्याने तुम्हाला अंकुर फुटलेला आढळेल, आणि तीन महिन्यांनी त्याचे रोप होईल. सहा महिन्यात त्यावर फुलं येऊ लागतील. पण या दहापैकी एकच बीज असं आहे, की त्याच्या रोपावर निळ्या रंगाचं फूल उमलेल, ज्याच्या घरी हे निळं फूल फुलेल, त्यानं ते 'गुरुदक्षिणा' म्हणून मला आणून द्यावं. जो मला ते फूल देईल, त्याचं शिक्षण, ज्ञान चिरस्थायी होईल. मी शिकवलेल्या साऱ्या विद्या शाश्वत रूपात त्याच्या स्मरणात राहातील. अशी सुसंधी तुम्हापैकी एकाला मिळेल. बाकी सर्वांना नेहमी वाचन, मनन, चिंतन करत मिळवलेलं ज्ञान स्मरणात ठेवत राहावं लागेल."
गणनाथ नाराज होत म्हणाला, "गुरुजी, यापेक्षाही मूल्यवान दक्षिणा देण्याची आमची ऐपत आहे. फक्त हे एक फूल देऊन आम्ही संतुष्ट का व्हावं?"
"वेडा कुठला! अरे ते फूल चावून खाल्ल की, पाऊस केंव्हा येईल, याबद्दल महिनाभर अगोदरच समजेल, अशी शक्ती त्यात आहे. ती शक्ती आज माझ्यात नाही. ते फूल इतरांना एक साधं फूल असेल, पण माझ्या लेखी ते 'अमोघ फूल' आहे. माझ्या गुरूचा मला आदेश होता की - माझ्या शिष्याकडून मला मिळणारं फूल माझ्या अपयोगी पडेल. म्हणूनच मी तुम्हा शिष्यांची मदत घेत आहे." स्वामीजींनी त्यांना पुरे स्पष्टीकरण दिले.
सर्व शिष्य आपापल्या गावी पोचले. शिवपुराला पोचल्यावर गुरुनाथने आपल्या घराच्या परसात बी पेरले. परमानंदस्वामी सारख्या श्रेष्ठ गुरूंकडून विद्या संपादन आल्यामुळे त्याच्या शिक्षणाबाबत चौकशी करायला अन त्याला भेटायला गावचे लोक त्याच्या घरी आले.
गुरुनाथच्या विद्येबाबत जाणून घेतल्यावर त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने विचारले, "हे शिक्षण अन ज्ञान वगैरे बाबत मला काहीच माहिती नाही. पण मला इतकं मात्र कळतंय की गावात पाऊस केंव्हा होईल हे आम्हाला कळत नाही, त्यामुळे पिकेही नीट घेता येत नाहीत. तेंव्हा तुझ्या ज्ञानाच्या मदतीने एवढी गोष्ट तू आम्हाला सांगू शकलास तर सारा गाव तुझा आभारी होईल, तुला सर्वजण मान देतील."
इतकंच काय, पण सर्वजण तुझी पूजा बांधू लागतील."
त्याचे बोलणे ऐकून गणनाथच्या मनात नाना तऱ्हेचे विचार थैमान घालू लागले. तोपर्यंत गुरूंनी दिलेली फूल त्याला संतोषजनक वाटत नव्हती. आता त्याला वाटू लागले की, "आपल्या झाडाला निळं फूल लागलं, तर ते घेऊन लागलीच त्यांच्याकडे जावे लागेल. त्यापेक्षा गुरुजींना ती गुरुदक्षिणा न देता फूल आपणच खाऊन टाकलं तर साऱ्या विद्या शाश्वत रूपात आपल्या स्मरणात राहातीलच. पण गुरुच्या ज्ञानाहूनही श्रेष्ठ असणार आहे हे फूल! पाऊस केंव्हा पडेल, ते या फुलाच्या साहाय्याने मी अगोदर जाणून घेईन. या ज्ञानामुळे मला प्रसिद्धि, गौरव आणि धनही प्राप्त होईल."
त्या दिवसापासून गणनाथ रोज देवळात जाऊन भक्ति व श्रद्धेपूर्वक देवपूजा करू लागला. त्याची एकच इच्छा अन प्रार्थना असे की ते निळ्या रंगाचे फूल आपल्या रोपावर फुलावे.
दिवस जात राहिले. बीतून अंकुर फुटला, रोप वाढले, यथाकाल त्यावर कळी धरली; अन् एक दिवस तिथे फूल झाले! आश्चर्य म्हणजे त्यावर पांढरा किंवा अन्य कसला एवढासाचा ठिपकाही नसून, ते केवळ निळ्याशार रंगाचे टवटवीत फूल होते!
गणनाथच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने फूल तोडले. पण ते तोंडात घालता घालता तो एकदम थांबला! 'आपली काही चूक तर होत नाही ना? हे फूल खरं तर गुरुदक्षिणा म्हणून नेऊन द्यायला हवं' असा विचार त्याच्या मनात आला, अन् सदसद्विवेक बुद्धीशी झगडा सुरू झाला.
"गुरुजींनी तरी कुशलाच विशेष रूपानं शिक्षण देऊन पक्षपात दाखवला की! आता देवाचीत माझ्यावर खास कृपा असल्यानं निळ्या रंगाचं फूल त्याच्या बीजातून नव्हे, तर माझ्या बीजातून फुललंय, तेंव्हा त्या फुलाचा खरा हकदार तर मीच आहे. तेंव्हा ते खाऊन अद्भुत शक्ति मिळवणं चूक होणार नाही." अशी स्वतःची समजूत घालून, त्याने ते फूल खाऊन टाकले.
सांगण्यावर विश्वास ठेवला नाही. तरीही त्याने ही बातमी गावकऱ्यांना सांगितली. थोड्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला, तर काही लोकांनी गणनाथची चेष्टा केली.
परंतु गणनाथच्या सांगण्याप्रमाणे बरोबर दोन दिवसांनी खरोखर शिवपुरमध्ये पाऊस पडला. त्या दिवसापासून त्याच्या परिस्थितीत आमूलाग्र फरक पडला. दोन-तीन वर्षांत तो गावातला सर्वात धनवान माणूस बनला. आपापल्या गावात पाऊस पडेल, हे विचारण्यासाठी त्या पंचक्रोशीतल्या साऱ्या खेडोपाड्यातली माणसे त्याच्याकडे येऊ लागली.
अशातच एका वर्षी त्या साऱ्या मुलुखात दुष्काळ पडला, लागोपाठ दोन वर्षे पावसाने आपले तोंड लपवले. गणनाथने सर्वांना सांगितले की, अजूनही एक महिना कुठेच पाऊस पडणार नाही.
इतक्यात शेजारच्या गावचा एक माणूस येऊन पाटलाला भेटला. त्यावेळी गणनाथही तेथे हजर होता. शेजारगावच्या माणसाला पाहून गणनायला वाटले, की तो आपल्यालाच भेटायला आला आहे. जराही विचार ভাবনা न करता तो त्या गावकऱ्याला म्हणाला, "अरे, माझ्याकडून काय फायदा? दुष्काळ तर सर्वत्रच पडला आहे. जो पाऊस इथे पडला नाही, तो तुमच्या गावात थोडाच पडेल?"
पण मोठ्या विनयपूर्वक तो गावकऱ्या म्हणाला, "महाशय, पाऊस केंव्हा पडेल, याबद्दल प्रथम आपण सांगत होता. पण यावेळी तुमचा अंदाज चुकला. आमच्या गावात एक महाशय आले आहेत. त्यांनी 'दोन दिवसांनी पाऊस येईल' असं सांगितलं अन बरोबर पाऊस पडला. तुम्ही त्यांना आपल्या गावी बोलावून घ्या."
हे ऐकताच गणनाथचा चेहरा पांढरा पडला! तो विरोध करत राहिला; पण त्याचे काहीही न ऐकता गावकऱ्यांनी त्या माणसाला आपल्या गावी बोलावले.
लोकांनी बोलावून आणलेल्या व्यक्तीला - कुशला - पाहताच गणनाथ आश्चर्यचकित झाला! त्याने कुशला सर्वकाही सांगून म्हटले, "आजपर्यंत माझं एकही भविष्य खोटं ठरलं नाही. मला तर असं वाटतंय की आता तुझ्या येण्यात अन गुरुजींचा हात असला पाहिजे."
यावर हसून कुश म्हणाला, "यात गुरुजींचा हातही नाही अन त्यांचा काही महिमा वगैरेही नाही. त्यांनी तर आपणा सर्वांना निळ्या रंगाच्या फुलांचे बी दिले होते. आपल्या गुरुभक्तीची परीक्षा त्यांना पाहायची होती. ते फूल घेऊन कोणीही त्यांच्याकडे जाऊन गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केलं नाही. मीच फक्त एकटा त्यांच्याकडे गेलो, ते माझ्यावर फार प्रसन्न झाले अन् अचानक पाऊस पाडण्याची अजब शक्ती त्यांनी मला दिली. या शिवाय त्यांनी मलाच ते फूल चांगले चावून खायला लावले. या विद्येचा दुरुपयोग न करण्याचा सल्ला त्यांनी मला दिला. त्यामुळेच 'आपल्यात पाऊस पाडण्याची शक्ती आहे' असं मी कोणालाही सांगत नाही. जनतेची तितकी सेवा करून मदत करत असतो मी त्यांना."
हे ऐकून गणनाथ विचारात पडला. आता त्याला कळून चुकले की ज्याला त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्ञानप्राप्ती होत असते. तसे तर सर्वांनाच समान शिक्षण मिळाले होते; पण एकट्या कुशमध्ये एकाग्रता होती. इतरांच्यात तिचा अभाव होता. यामुळे इतर शिष्य ज्ञानार्जनात मागे राहिले. हे सत्य जाणून आता गणनाथला पश्चात्ताप वाटू लागला.