Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || एक || 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“परंतु त्या आमच्याशी बोलू लागल्या तर?”

“अत्यंत सावध व दक्ष राहा.”

आनंदला स्त्रीजातीविषयी सहानुभूती वाटे. स्त्रियांनाही संघात घ्यावे म्हणून त्यांचा आग्रह होता. स्त्रियांची बाजू तो मांडी. शेवटी बुद्धांनी संमती दिली. संमती देणे हाच योग्य मार्ग होता. परंतु हा मार्ग योग्य असला तरी उपयुक्त होताच, असे कदाचित् म्हणता येणार नाही. एकदा बुद्धां म्हणाले, “आनंदा स्त्रियांना जर संघात प्रवेश दिला नसता, तर शुद्ध धर्म अधिक काळ टिकला असता. संघाचे कल्याणकर नियम सहस्त्र वर्षे टिकले असते. परंतु ज्या अर्थी त्यांना आता प्रवेश दिलाच आहे, त्या अर्थी हे नियम आता पाचशेच वर्षे
राहतील.” संघात शिरताना स्त्रियांना आप्तेष्टांची संमती घ्यावी लागे. परंतु पुरुष निदान दिसायला तरी अधिक स्वतंत्र होता. स्वत:चा स्वामी होता. त्याला कोणाला विचारावे लागत नसे. संघाचे नियम अभंग नव्हते. बुद्धा म्हणतात, “ मी गेल्यावर संघाला वाटले तर संघाने कमी महत्त्वाचे असे बारीकसारीक नियम काढून टाकावे.”

महापरिनिब्बाणसूत्तांत बुद्धांच्या मरणाची कथा अत्यंत साधेपणाने परंतु करुण रीतीने देण्यात आलेली आहे. त्यांचे आता ८० वर्षांचे वय होते. प्रवासाने व यातायाताने ते थकून गेले होते. त्यांच्या अंगात आता त्राण उरले नव्हते. ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये कुशिनगराजवळच्या एका गावी बुद्ध मरण पावले. काशीपासून हा गाव १२० मैल दूर होता. सॉक्रेटिस, ख्रिस्त हे हुतात्मे झाले. परंतु बुद्धांचे मरण अति शांत असे होते. या तिघा महात्म्यांनी आपापल्या काळातील अंधश्रद्धा, भोळकटपणा, दुष्ट रुढी यांचे निर्मूलन केले. सॉक्रेटिस अथेन्समधील तत्कालीन धर्माचा जितका विरोधी होता, त्यापेक्षाही गौतम बुद्ध यज्ञयागात्मक अशा वैदिक धर्माचे विरोधी होते. असे असूनही ते ८० वर्षांपर्यंत जगले. कितीतरी अनुयायी त्यांनी गोळा केले व स्वत:च्या आयुष्यातच एक धार्मिक संघ त्यांनी स्थापिला. बुद्धांना हुतात्मा व्हावे लागले नाही. कारण भारतीयांचा स्वभावच धर्मिक. रुढ धर्माविरुद्ध बंड करणा-यासही हिंदुस्थानात सहानुभूतीने वागविण्यात येई. पूर्वेकडचा व पश्चिमेकडचा हा फरक आहे.

« PreviousChapter ListNext »