Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || एक || 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बुद्ध हे नैतिक विजयाचे महान वीर होते. परंतु अशा या मूर्तिमंत नीतीधर्माला, या थोर महात्म्याला संघाच्या नीतिनियमांविषयींच्या बारीकसारीक गोष्टींतही लक्ष घालावे लागे. एखादी संस्था स्थापणे म्हणजे जगाशी तडजोड करणे, सामाजिक गरजा मान्य करणे. समाजाच्या सर्वसाधारण चाकोरीच्या जीवनात ज्यांना समरसता वाटत नाही, अशांच्यासाठी आश्रयस्थान निर्मिणे म्हणजे एखादी संस्था, संघटना स्थापिणे. बुद्धांनी असा संघ स्थापिला. परंतु त्यात अव्यवस्था माजली. काही भानगडी सुरु झाल्या. बुद्धांचा देवदत्त नावाचा एक पुतण्या होता. बुद्धांना बाजूस सारुन स्वत:च संघाचा मुख्य व्हावे अशी त्याची मनीषा होती. बुद्धांच्या विरुद्ध त्याने कारस्थान केले. परंतु शेवटी त्याला क्षमा करण्यात आली. एकदा एक भिक्षु अतिसाराने आजारी पडला. तो मलमूत्रात लोळत होता. बुद्धांनी ते पाहिले त्यांनी त्याचे अंग धुतले. त्याचे अंथरुण बदलले; आवडता शिष्य आनंद बुद्धास त्या कामात साहाय्य देत होता. बुद्ध शिष्यांना म्हणाले, “हे भिक्षूंनो, जो कोणी माझी शुश्रूषा करु इच्छील, तो आजा-याचीही शुश्रूषा करील.” बुद्धधर्मीय संघटनेत जातिभेदांस वाव नव्हता. बुद्ध उपदेशितात, ‘हे भिक्षूंनो, ज्याप्रमाणे गंगा, यमुना, अचिरावती, शरयू इत्यादि मोठमोठ्या नद्या समुद्राला मिळाल्यावर स्वत:ची पूर्वीची नावे व कुळे विसरतात आणि त्या सर्वांना सागर हे एकच नाव प्राप्त होते, त्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण ज्या वेळेस तथागताने शिकविलेल्या धर्मा प्रमाणे, नियमांप्रमाणे वागून संकुचित संसारातून, विश्वसंसारात येतात, स्वत:ची घरेदारे सोडून ‘हे विश्वची माझे घर’ अशा स्थितीप्रत पोचतात, त्या वेळेस ते नाम-गोत्र विसरतात. भिक्षु या एकाच नावाने ते सारे संबोधिले जातात.’

बुद्धांच्या काळात स्त्रियांना स्वतंत्र्य होते. स्त्रियाही पवित्र जीवन कंठू शकतात, वैराग्यमय असे धर्ममय जीवन कंठू शकतात, अशी बुद्धांनी घोषणा केली. आयुष्याच्या अखेरच्या वर्षी अंबपाली येथे एका वेश्येच्या घरी बुद्धांनी भोजन केले. परंतु संघात स्त्रियांना प्रवेश देण्यापूर्वी ते पुष्कळ वेळ घुटमळत होते. एके दिवशी आनंदने त्यांना प्रश्न केला, “भगवन्, स्त्रियांच्या बाबतीत आम्ही कसे वागावे?”

“आनंद, त्यांचे दर्शन घेऊ नकोस; त्यांच्याकडे पाहू नकोस.” ते म्हणाले.

“परंतु आमची व त्यांची गाठ पडली, तर आम्ही काय करावे?”

“त्यांच्याशी बोलू नकोस.”

« PreviousChapter ListNext »