Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || एक || 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बुद्ध संतापाने पेटले आहेत, त्यांच्या तोंडातून कठोर व निष्ठुर शब्द बाहेर पडले आहेत, असे कधीच झाले नाही. मानवजातींविषयी त्यांना अपार सहानुभूती वाटे. बुद्धांना हे जग दुष्ट नसे वाटत. जग वाईट आहे असे म्हणण्याऐवजी जगाचे अज्ञान आहे असे ते म्हणत. जग उच्छृंखल आहे असे म्हणण्याऐवजी ते तितकेसे समाधानकारक नाही असे ते म्हणत. बुद्ध विरोधाला शांतपणे व आत्मविश्वासाने तोंड देत. त्यांच्यापाशी चिडखोरपणा नाही, भयंकर संताप नाही. बुद्धांची वागणूक म्हणजे मूर्तिमंत सुसंस्कृतता; त्यांचे वर्तन म्हणजे सद्भावाचे आविष्करण. त्यांच्या वर्तनात थोडासा उपरोधिकपणा असे. परंतु त्यामुळे त्यांचे गोड वर्तन अधिकच रुचकर व स्वादिष्ट वाटे. एकदा त्यांचे परिभ्रमण चालले असता एका गृहस्थाने फारच कटु शब्द त्यांना उद्देशून उच्चारले. बुद्ध शांतपणे म्हणाले, “एखाद्याने याचकापुढे अन्न ठेवले, परंतु याचकाने जर ते नाकारले तर, ते अन्न कोणाचे?”

“त्या देणा-या गृहस्थाचे.” तो मनुष्य म्हणाला.

“त्याप्रमाणे जर तुमचे शिव्याशाप मी स्वीकारायचे नाकारले, तर ते तुमच्याकडे परत येतील. तुम्हालाच त्यांचा स्वीकार करावा लागेल, नाही? परंतु मला मात्र दरिद्री होऊन जावे लागत आहे. कारण मी एक मित्र गमावून बसलो.” बुद्ध म्हणाले.

सक्तीने धर्मांतर करायला लावणे ही गोष्ट बुद्धांना ठावी नव्हती. त्यांच्या धर्मपद्धतीचा पाया अंधविश्वास नसून कृती हा होता. मानवी स्वभावाला विशिष्ट वळण लावावे, विशिष्ट सवयी लावाव्या अशी त्यांची इच्छा होती. आपण आपल्या या मूर्ख वासनांमुळे दु:खी होतो. सुखी होण्यासाठी एकच मार्ग आहे, एकच गोष्टीची आवश्यकता आहे. स्वत:साठी एक नवीनच हृदय निर्माण करणे, नवीन डोळ्यांनी पहायला शिकणे ही ती गोष्ट. आपण मनातले असद्विचार जर दडपू व सद्विचारांची जर वाढ करु, तर आपले हे दु:खी मन, हे असज्जन मन सु:खी व सज्जन होईल. बुद्ध धर्मातराचा विचार करीत नाहीत. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा. बुद्ध यज्ञपूजक ब्राह्मणाच्याही पवित्र होमाग्नीसमीप बसतील, नि स्वत:चे विचार सांगतील. स्वत:चे प्रवचन करीत असताना ते चुकूनही ब्राह्मणाच्या त्या पूजाधर्माची टवाळी करणार नाहीत. सिंह नावाचा एक जैन होता. पुढे तो बुद्धधर्मिय झाला. परंतु पर्वीप्रमाणेच स्वत:च्या घरी येणा-या जैन श्रावकांस तो अन्न देई, देणग्या देई. पूर्वीचा तो प्रघात चालू ठेवण्यासाठी त्याला मुद्दाम सांगण्यात आले होते. बुद्ध आपले विचार अत्यंत सौम्यपणे सांगत असत. दुस-यांची मने वळवण्यास सत्य स्वत:च समर्थ असते. गौतम बुद्ध सत्यावर सारे सोपवीत, सत्यच्या सामर्थ्यावर विसंबत.

« PreviousChapter ListNext »