Bookstruck

अरण्यकांड - भाग १

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
अत्रिऋषींच्या भेटीपाशी अयोघ्याकांड संपले होते. अरण्यकांडामध्ये रामाचा तेथून पुढला वनातील प्रवास वर्णिला असून सीताहरणापर्यंत त्याचा विस्तार आहे. अत्रिऋषींच्या भेटीनंतर राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात गेले. राक्षसांचा उपद्रव असलेल्या प्रदेशात ते बराच काळ फिरत राहिले असे म्हटले आहे. अनेक मुनींना भेटले सर्वांनी राक्षसांच्या उपद्रवाबद्दल तक्रारी करून तूं आमचे रक्षण कर असे म्हटले. रामाने ते मान्य केले. हे मुनीना सतावणारे, नरभक्षक, यज्ञाचा विध्वंस करणारे (मानव)समाज म्हणजे राक्षस ही एक वेगळीच जमात म्हटली पाहिजे. रावणालाहि राक्षस म्हटले आहे पण रावण स्वत: सुसंस्कृत, यज्ञप्रेमी व विद्वान, त्याचे अनेक मंत्री व प्रजाजनहि यज्ञ करणारे असे पुढे वर्णन केले आहे त्यांचे या जमातीशी काही नाते मानता येणार नाही. मात्र ही नरभक्षक जमात रावणाच्या अंकित होती असे दिसते व त्यांची लंकेतहि वसती असावी कारण रावणाच्या सैन्यात त्यांचा समावेश होता.
रामाची गाठ विराध नावाच्या राक्षसाशी पडली. कोणत्याही शस्त्राने न मरण्याचा वर त्याला ब्रह्मदेवाने दिला होता! तो रामाशी बोलला! कोणत्या भाषेत ते सांगितलेले नाही. आपल्या वराची माहिती त्यानेच रामाला दिली. महत्प्रयासाने राम-लक्ष्मणांनी त्याला मारले, कसे तर, एक मोठा खड्डा करून, अर्धमेला झाल्यावर त्याला गाडून टाकले. अनपेक्षित अडचणीवर युक्तीने मात केली. नरभक्षक राक्षस व राम यांचा प्रत्यक्ष संग्राम मात्र, दुसरा एकहि, पंचवटीला जाईपर्यंत वर्णिलेला नाही. विराधवधानंतर राम शरभंग मुनीच्या आश्रमास गेला. त्यानंतर पुन्हा अनेक मुनींनी राक्षसांपासून रक्षण करण्याची विनंति केली व रामाने ती मान्य केली. मुनीनी केलेल्या राक्षसांच्या अत्याचारांच्या वर्णनात तुंगभद्रा नदी व जवळचे पंपासरोवर, तसेच मंदाकिनी नदी व चित्रकूट या दोन्हीचा उल्लेख आहे. म्हणजे हा सर्वच मुलूख राक्षसांच्या उपद्रवाने ग्रस्त होता. राम मुनीना म्हणाला कीं राक्षसांच्या शासनासाठीच पित्याच्या आज्ञेने मी वनात आलो आहे. मात्र दशरथाने रामाला असा काही आदेश दिलेला नव्हता!
यानंतर हे मुनिगण व राम-लक्ष्मण सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमाला ’दुथडी वाहणार्‍या नद्या’ पार करून गेले. कोणत्या नद्या हे सांगितलेले नसल्याने सुतीक्ष्णाचा हा आश्रम कोठे होता व राम चित्रकूटापासून किती दूर वा किती दक्षिणेला आला होता हे कळत नाही. ’माझ्या निवासासाठी मी कोठे कुटी बांधावी’ असे रामाने सुतीक्ष्णाला विचारले. चित्रकूट सोडल्यापासून हा वेळपर्यंत रामाने कोठेच कुटी बांधलेली नव्हती. सुतीक्ष्णाने म्हटले कीं हा माझा आश्रमच तुमच्या निवासाला योग्य आहे. पण रामाने ते मानले नाही. एक रात्रच मुक्काम करून राम निघाला तेव्हा सुतीक्ष्णाने म्हटले कीं दंडकारण्यातील मुनींचे आश्रम पहात फिरा व नंतर पुन्हा येथे या.
Chapter ListNext »