Bookstruck

अरण्यकांड - भाग २

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
रामाने मुनींना राक्षसांपासून संरक्षण करण्याचे आश्वासन दिले होते,पण सीतेने नवव्या सर्गात असे म्हटले कीं ’आपण वनात असताना मुनिवृत्तीने रहावे, क्षात्रधर्माने वागूं नये, प्राण्यांची हिंसा करू नये व राक्षसांशीहि अकारण वैर धरूं नये. अयोध्येस परत गेल्यावर मग क्षात्रधर्माचे पालन करावे!’ मात्र रामाने हा सल्ला मानला नाही व राक्षसांचे पारिपत्य करणे हे माझे काम आहे असे बजावले. प्रत्यक्षात मात्र विराध सोडून इतर कोणाही राक्षसाशी रामाचे युद्ध झालेले नाही! विराधाने स्वत:च राम-लक्ष्मणांवर हल्ला केला होता, मुनीना त्रास दिला म्हणून त्याचे पारिपत्य केले नव्हतेच.
रामाचा प्रवास चालूच होता. वाटेत लागलेल्या पंचाप्सर नावाच्या सरोवराचे वर्णन सर्ग ११ मध्ये येते पण स्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत त्यामुळे राम कोठवर पोचला होता याचा उलगडा होत नाही. यानंतर रामाने निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत निवास करीत दहा वर्षे काढली असा स्पष्ट उल्लेख आहे. चित्रकूट सोडल्यापासून आतापर्यंत रामाने कुटी बांधून कोठेहि वास्तव्य केलेलेच नाही! चौदा वर्षांपैकी ३-४ महिने चित्रकूटावर राहून त्यानंतर दीर्घकाळ प्रवासात व निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत व्यतीत झाला. विराध सोडून एकाही राक्षसाशी युद्ध झाले नाही. निव्वळ रामाच्या वावरामुळे राक्षसांचा उपद्रव शमला होता असे म्हणावे लागते. या दीर्घ प्रवासानंतर राम पुन्हा सुतीक्ष्णाच्या आश्रमाला आला व त्यांचा सुतीक्ष्णाने सन्मान केला.
मग रामाला अगस्त्य ऋषींना भटण्याची इच्छा झाली व सुतीक्ष्णानेहि दुजोरा देऊन जवळच चार योजनांवरील अगस्त्याच्या आश्रमाचा रस्ता सांगितला. वाटेतील अगस्त्याच्या भावालाहि भेट देऊन राम अगस्त्य मुनीना भेटला. अगस्त्यांनी रामाला अनेक आयुधे दिलीं. रामाने अगस्त्यांना विचारले कीं मी कोठे कुटी बांधावी? अगस्त्यांच्या आश्रमस्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत पण त्याने रामाला सुचवले कीं दोन योजनांवरील पंचवटी हे स्थळ तुमच्या निवासासाठी योग्य. येथे मात्र ’गोदावरीतीराजवळील’ असा स्पष्ट भौगोलिक संदर्भ प्रथमच मिळतो. सध्याच्या पंचवटीचे गोदासान्निध्य पाहतां तीच रामायणातील पंचवटी मानतां येते. चित्रकूट ते पंचवटी एवढे दीर्घ अंतर रामाने ११-१२ वर्षे प्रवासात काटले असे दिसते मात्र प्रवास मार्ग कळत नाही. पुढे इतिहासकाळात उत्तरेकडून दक्षिणेत येण्याचा मार्ग बर्‍हाणपुरावरून खानदेशातून (मोगलकाळी) वा राजस्थान, सौराष्ट्र गुजरात असा असे. राम मध्य्भारतातून विंध्य-सातपुडा ओलांडून आला असावा.
पंचवटीच्या वाटेवर जटायु भेटला, मनुष्यवाणीने बोलला व मीहि तुमच्या आश्रयाने राहीन असे म्हणाला. तेव्हा ही एक आर्य़ांशी मैत्रीने वागणारी मानवांचीच जमात म्हटली पाहिजे.
पंचवटीवर लक्ष्मणाने कुटी बांधली. चित्रकूटावरहि त्यानेच बांधली होती. सेतू बांधायला राम इंजिनिअर होता का असा प्रश्न हल्ली केला गेला. कुटी बांधणारा लक्ष्मण बहुधा इंजिनिअर असावा ! पंचवटीवरहि रामाचे वास्तव्य ३-४ महिनेच झाले. कसे ते पुढच्या भागात पाहूं.
« PreviousChapter ListNext »