अनुभवात्मक जगात आपण नाना संज्ञा वापरतो, नाना वर्णने करतो, हे आहे, हे नाही असे आपण म्हणतो. परंतु वस्तूच्या वरपांगी स्वरूपाच्या पलीकडे आपण जाऊ आणि बघू तर आपले हे अस्तिपक्षी किंवा नास्तिपक्षी केलेले विधान बरोबर नाही असे दिसून येईल.  जे प्रत्यक्ष घडत आहे त्याचे वर्णन करायला वाणी अपुरी आहे.  आहे आणि नाही यांच्या दरम्यान किंवा या दोहोंच्याही अतीत सत्य असण्याचा संभव आहे.  नदी अखंड वहात असते; या क्षणापासून त्या क्षणाला ती तशी दिसते; परंतु नदी तशीच दिसली तरी पाणी सारखे बदलत आहे. तसेच अग्नीचे, ज्वाला जळत असते; तिचे स्वरूप, आकार तीच असतात.  परंतु तीच ज्वाला अखंड कधीही नसते.  ती सारखी बदलत आहे.  जगात सारेच क्षणाक्षणाला बदलत आहे, व वेगवेगळ्या स्वरुपाने प्रतीत होणारे जीवन म्हणजे स्थित्यंतरांचा एक अखंड प्रवाह आहे.  अंतिम सत्य म्हणजे काही एक शाश्वत, अव्यय असे नाही, किंबहुना अंतिम सत्य म्हणजे एक प्रकारे काही एक प्रस्फूर्त शक्ती आहे.  ही शक्ती बलरुप, गतिरुप आहे, नाना पौर्वापर्यांची अखंड मालिका आहे.  काळ म्हणजे वेगवेगळ्या घडलेल्या घटनांचा आपण अनुभव घेत घेत त्या अनुभवातून निघालेली व अंगवळणी पडलेली एक नुसती कल्पना आहे.  एक गोष्ट दुसर्‍या गोष्टीचे कारण असे आपण म्हणू शकणार नाही.  कारण ज्याचे स्थित्यंतर होऊन एकाचे दुसरे रुप भासते, असे मूळचे शाश्वत काहीही नाही.  वस्तूचे खरेखुरे रूप म्हणजे इतर तथाकथित वस्तुजाताशी त्याचा असलेला सतत व नियमबध्द संबंध होय.  क्षणाक्षणाला आपले शरीर, आपला आत्मा बदलत आहे.  त्याचे अस्तित्व लय पावते व स्थित्यंतर होऊन त्याच्यासारखेच परंतु त्याच्यापासून निराळे दिसू लागते व तेही पुन्हा नाहीसे होते.  एका अर्थी आपण क्षणाक्षणाला मरत आहोत आणि पुन्हा जन्मत आहोत.  हे सारखे सुरू असल्यामुळे एका अखंड रूपाचा आभास उत्पन्न होतो.  ''सदैव बदलणार्‍या एकतेचे हे सातत्य असते.''  सारे वस्तुजात स्थित्यंतर पावणारे गतिमान, प्रवाही आहे.

ठरीव पध्दतीने विचार करण्याची आपणांस सवय असल्यामुळे आणि ठरीव पध्दतीने सृष्टीतील घडामोडींचे विवरण करण्याची सवय असल्यामुळे, आपल्याला हे सारे समजायला जड जाते.  परंतु अर्वाचीन सृष्टिशास्त्रातील काही कल्पनांशी, अर्वाचीन तत्त्वज्ञानातील काही विचारांशी बुध्दांचे विचार जुळतात, त्यांच्या ते जवळ येतात, हे लक्षात घेण्याजोगे आहे.

बुध्दांची पध्दत मानसशास्त्रीय पृथक्करणाची होती.  या अतिअर्वाचीन शास्त्रात बुध्दांची अंतर्भेदी दृष्टी किती खोल जात असे हे पाहून आश्चर्य वाटते.  शाश्वत अशा एखाद्या आत्मतत्त्वाशी संबंध न जोडता मानवी जीवनाचा विचार आणि परीक्षण केलेले आहे.  कारण असा आत्मा असला तरी तो आपल्याला अगम्य आहे.  मन हे शरीराचाच एक भाग आहे व निरनिराळ्या मानसिक शक्तींचे संयुक्त स्वरूप म्हणजेच मन असे मानले आहे.  ह्यामुळे व्यक्ती म्हणजे नानाविध मानसिक स्थितींचे एक गाठोडे व स्वत्वाची भावना म्हणजे विचारांचा एक प्रवाह ठरला.  व्यक्तीची चालू स्थिती म्हणजे ती त्याच्या पूर्वविचारांचा चालू परिणाम आहे.  हे जीवन दु:ख व क्लेश यांनी भरलेले आहे असे सारखे वारंवार सांगितले आहे.  ही दु:खे, त्यांची कारणे, ती दूर करण्याची शक्यता, आणि त्याचा मार्ग यालाच बुध्दाने सांगितलेली दु:ख, समुदय, निरोध, मार्ग ही 'चार आर्य सत्ये' म्हणतात.  ते आपल्या शिष्यांना एकदा म्हणाले, ''युगानुयुगे तुम्ही दु:ख, क्लेश भोगत आहात व ह्या जीवनयात्रेत वाट चुकून भटकताभटकता कष्टी होऊन रडतारडता चार समुद्रांतील पाण्यापेक्षाही अधिक पाणी तुमच्या डोळ्यांतून वाहिले आहे.  त्याचे कारण एकच की ज्या गोष्टी तुम्हांला डोळ्यासमोरही नको होत्या, त्याच तुमच्या वाट्याला होत्या; आणि ज्या गोष्टी तुम्हांला हव्याशा वाटत होत्या, त्या तुमच्या वाट्याच्या नव्हत्या.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel