प्रत्येक सुधारणासंपन्न जीवनपध्दतीच्या इतिहासात र्‍हासाचे, विनाशाचे काळ येतात आणि हिंदी इतिहासातही यापूर्वी असे काळ येऊन गेले होते, परंतु भारत त्यांना पुरून उरला, त्याला पुन्हा नवयौवन लाभले...केव्हा केव्हा त्याला अंग चोरून कवच घालावे लागे.  परंतु काही काळाने त्याला नवा दम येऊन तो कवच सोडून मोकळा वावरू लागे.  अंत:स्फूर्तीचा गाभा जसाच्या तसा कायम राहून त्याच्या जोरावर तो नवे संबंध जोडून नव्याने वाढू लागे व त्याच्या पूर्वीच्या रूपात फरक पडत असला तरी मूळ गाभ्याचा संबंध पक्का राही.  नवीनाला आत्मसात करणे, त्याच्याशी जुळवून घेणे ही मनाची लवचिक ठेवणे, विकासक्षमवृत्ती, भारतात उरली नव्हती काय ? ज्या या विशेष वृत्तीमुळे अनेक आपत्तींतून आतापर्यंत भारत वाचला होता, ती शक्ती आता नष्ट झाली होती काय ?  सामाजिक वर्णभेद उत्तरोत्तर कडक होत गेल्यामुळे, वेगवेगळी धर्ममते, हटवादी झाल्यामुळे भारतीयांची मनोवृत्तीही निर्जीव, कडक झाली काय ?  कारण जीवनाची उत्क्रांती, वाढ खुंटताच विचाराची वाढही खुंटते.  तोपर्यंत हिंदुस्थान म्हणजे आचाराने सनातनी परंतु विचाराने प्रक्षोभक आणि क्रांतिकारक असे मोठे विचित्र मिश्रण होते.  अर्थात त्या नवविचाराचा शेवटी आचारावर परिणाम होईच; परंतु हे भारतीय पध्दतीने होई.  भूतकालाविषयी अनादर न दाखविता जुन्यात नवीन दाखल होई.  ''डोळे जरी प्राचीन वाक्याकडे, शब्दाकडे असले तरी बुध्दी त्यात नवीन अर्थ पाही; आणि यामुळे हिंदुस्थानचे स्वरूप सदैव बदलत आले आहे.''  असे फ्रेंच पंडित म्हणतात.  परंतु विचारातील प्रक्षोभशक्ती नष्ट होताच, सर्जनशक्ती मावळताच केवळ जुनाट अर्थहीन आचाराला, रूढीलाच महत्त्व येऊन, बुध्दी त्या आचाराची गुलाम झाली, जरा काही नवीन दिसले, तर त्याला बाऊ वाटू लागला.  जुनी वचने पोपटाप्रमाणे बडबडणे एवढेच उरले.  असे होऊ लागून जीवनाचे साचीव डबके बनले व स्वत:च निर्माण केलेल्या तुरुंगात जीवन कैदी होऊन पडले.

सुधारणासंपन्न जीवनपध्दती एकाएकी कोलमडून पडल्याची अनेक उदाहरणे जगाच्या इतिहासात आहेत.  सर्वांत प्रमुख उदाहरण म्हणजे रोमच्या पाडावानंतर कोलमडून पडलेल्या प्राचीन रोम संस्कृतीचे देता येईल.  उत्तरेकडून हल्ले येऊन पडण्यापूर्वीच रोम स्वत:च्या दौर्बल्यामुळे पडण्याच्या बेतातच आले होते.  ते आतून पोखरलेले होते.  एके काळी विकासोन्मुख असणारी त्याची अर्थव्यवस्था गडगडली होती.  वाढता पसारा संपुष्टात येत होता, आणि त्याच्या पाठोपाठ मग अनेक अपरिहार्य आपत्ती आल्या.  शहरातील उद्योगधंदे बसले; भरभराटलेली मोठमोठी शहरे दरिद्री आणि छोटीछोटी झाली. सुपीकपणाही कमी झाला.  वाढत्या अडचणींना पायबंद घालण्यासाठी सम्राटांनी हरप्रयत्न करून पाहिले.  व्यापारी, कारागीर, कामगार यांना सक्तीने ती ती कामे, ते ते उद्योग करायला भाग पाडण्यात आले.  पुष्कळ कामगारांना आपल्या विशिष्ट धंद्याबाहेरच्या लोकांशी लग्न करण्याची बंदी करण्यात आली.  अशा रीतीने काही काही धंद्यांचे जातीत परिवर्तन करून बघण्यात आले.  शेतकरी गुलाम झाले; त्यांना केवळ राबणारे करण्यात आले.  परंतु र्‍हास थांबविण्यासाठी योजलेले हे सारे उपाय फोल ठरले, एवढेच नव्हे तर, परिस्थिती अधिकच बिघडली, आणि शेवटी रोमन साम्राज्य रसातळाला गेले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel