आपल्या वैयक्तिक जीवनातही, देह व मन निसर्गाचा एक अंश म्हणून व समाजाचा एक घटक म्हणून आपल्या भूमिका, या दोहोंमध्ये कशाला महत्त्व किती द्यावे ते आपण शोधून काढणे अवश्यक आहे.  टागोर म्हणतात, ''आपल्याला पूर्णावस्था प्राप्त करून घ्यावयाची असली तर आपल्या जीवनशक्तीत निसर्गावस्थेत राहणार्‍या मानवाचा जोम पाहिजे, आपल्या मनोव्यापारात संस्कृतीचा संयम पाहिजे.  नैसर्गिक व्यवहारात निसर्गावस्था व सामाजिक व्यवहारात मानवी व्यवस्था सहज साधण्याची कला आपल्या अंगी असावी.''  पूर्णावस्था आपल्याला अगम्य आहे, कारण पूर्णावस्था म्हणजे आपल्या प्रवासाचा शेवट, आणि आपला प्रवास तर सारखा चाललेलाच असतो, आपण जितके पुढे जाऊ तितके आणखी पुढे पुढे सरकत जात असलेल्या कसल्या तरी अगम्याकडे जाण्याचा आपला यत्न सततच चालतो.  शिवाय प्रत्येक व्यक्ती म्हणजे तिच्या अंतरीच्या भिन्न भिन्न परस्पर विरोधी अनेक वृत्ती, यांतली प्रत्येक आपापल्या दिशेने ओढ घेत असतेच.  त्या घोळक्यात जीवन प्रिय मानणारी वृत्ती आहे तशी जीवनाची घृणा वाटणारी वृत्तीही आहे, जीवनाबरोबर जे सारे पत्करावे लागते ते स्वीकारण्याची वृत्ती आहे तशीच त्या जीवनातले बरेचसे टाकून देण्याचीही वृत्ती आहे.  या परस्परविरोधी प्रवृत्तींचा मेळ घालणे मोठे कठीण जाते, कधी एक तर कधी दुसरी शिरजोर बनते.  लाओत्से म्हणतात :—

जीवन गूढाचे ज्ञान । आपणा व्हावे म्हणोन ।
मनोविकार सांडोन । वर्ततो कधी ॥
तया जीवनाचा विस्तार । पसरला विविध अपार ।
तो देखावया साचार । जीवनी प्रेमे वर्ते ॥

मानवाला इतकी विचारशक्ती, इतकी ज्ञानग्रहणशक्ती आलेली आहे, त्याला ज्ञानाचा व अनुभवाचा एवढा मोठा संचय लाभला आहे, तरीसुध्दा जीवनाची रहस्ये त्याला फारच थोडी समजली आहेत, चैतन्याच्या संचारपध्दतीच्या गूढाविषयी फारतर काही काही तर्क चालवणे एवढेच काय ते त्याला शक्य झाले आहे.  पण त्या जीवनातील सौंदर्याचे रसग्रहण सानंद सतत करणे त्याला शक्य आहे आणि कलेच्या द्वारे जीवनात कलानिर्मिती करून, सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य अंगी असलेल्या देवाचा अधिकार निदान तेवढ्यापुरता तरी चालविणे त्याला शक्य आहे.  मानव हा मर्त्य आहे, दुबळा आहे, तो चुका करीतच असतो, त्याचे जीवन क्षणभंगुर व अनिश्चित आहे.  हे सारे खरे असले तरी अमर देवसृष्टीच्याच तत्त्वाचा काही अंश मानवात आहे हेही तितकेच खरे.  अ‍ॅरिस्टॉटल म्हणतो, ''आणि म्हणूनच, आपण मानव आहोत, मर्त्य आहोत, तेव्हा मानवी, मर्त्य विचार काय ते आपल्या मनात आणावे असा आपल्याला आग्रह करणारांचे आपण ऐकता कामा नये.  आपण अमर होऊन राहावे अशा प्रकारचे आचरण आपण शक्य तो ठेवले पाहिजे, व आपल्या अंगी वसत असलेल्या गुणांपैकी उत्तम गुणांच्या अनुरोधाने जीवन जगण्याची आपण पराकाष्ठा केली पाहिजे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel