पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर : गांधी व अहिंसा

आम्ही तुरुंगातून सुटून आलो तेव्हा राष्ट्राची स्थिती, हिंदुस्थान विरुध्द इंग्लंड ही तेड, कायम जशीच्या तशीच होती.  बंदिवासाचा परिणाम वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा होतो.  कित्येकांचा धीर खचून जातो किंवा निदान मन डळमळू लागते, तर इतर कित्येक अधिक खंबरी होत जातात, त्यांची तत्त्वावरची श्रध्दा वाढत जाते व बहुधा ह्या दुसर्‍या प्रकारच्या व्यक्तींचेच वजन सर्वसामान्य जनसमूहावर अधिक पडते.  राष्ट्रीय लढ्याच्या दृष्टीने पाहिले तर आम्ही तुरुंगात गेलो तेव्हा देशाची जी स्थिती होती तीच आम्ही सुटलो तेव्हाही होती, पण पर्ल हार्बरवरचा जपानचा हल्ला व त्यानंतर ज्या घटना घडल्या त्यामुळे परिस्थितीला काही एक वेगळाच ताण पडला व ती काही वेगळीच होऊन गेली.  आमची सुटका झाल्यावर लागलीच काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक भरली.  ती या वेगळ्या तंग वातावरणात भरली.  त्या वेळेपावेतो जपानने पुढे फारसा मुलूख मिळवला नव्हता, परंतु त्या युध्दात जपानच्या शत्रुपक्षावर मोठे महत्त्वाचे व मती कुंठित करून टाकणारे जे अनर्थ प्रसंग आले ते तेवढ्यात होऊन चुकले होते.  हे महायुध्द म्हणजे कोठेतरी दूर अंतरावर चाललेले, आपण लांबून पाहावयाचे ही स्थिती जाऊन ते हिंदुस्थानाजवळ येऊ लागले होते व त्याची झळ हिंदुस्थानला जवळून लागू लागली होती.  अशा भयकारक घटना घडत असताना ह्या संकटप्रसंगीच्या कार्यात आपल्याकडून आपणही काही चांगलाच हातभार लावावा अशी बलवत्तर इच्छा अनेक काँग्रेसजनांना होऊ लागली व या नव्या परिस्थितीत नुसत्या तुरुंगाच्या वार्‍या करीत बसणे त्यांना निरर्थक वाटू लागले.  पण आपला मान राखून सरकारशी सहकार्य करण्याचा एखादा मार्ग आम्हाला मोकळा झाल्याखेरीज व जनतेला प्रत्यक्ष कार्य करण्याची काही स्फूर्ति येईल अशी भावना जनतेत निर्माण करता आल्याखेरीज, आम्हाला तरी काय करता येण्यासारखे होते ?  आगामी संकटांच्या कल्पनेने फारतर नुसते भय वाटेल.  पण तेवढ्याने काही उपयोग होण्यासारखा नव्हता.

देशातील इतर पक्षोपपक्षांशी सहकार्य आम्हाला करता यावे व हे युध्द परक्या सरकारने आम्हाला गुलाम समजून आमच्या माथी मारलेले नाही; खरोखर आपल्या राष्ट्रानेच हे काम पत्करले आहे अशी भावना आम्हाला जनतेत निर्माण करता यावी, एवढ्याकरिता सबंध देशाची सरकारी सत्ता एखाद्या राष्ट्रीय मंत्रिमंडळाकडे देण्यात आली तर झाला गेला तो पूर्वीचा इतिहास व प्रस्तुत काली जे काही घडले ते सारे बाजला ठेवून या युध्दात, विशेषत: स्वदेशाच्या संरक्षणाकरिता सरकारशी सहकार्य करायला आम्ही फार उत्सुक झालो होतो.  या भूमिकेबद्दल सर्वसाधारणपणे काँग्रेस पक्षात आपसातच नव्हे, तर काँग्रेस व इतर पक्ष ह्यांच्यातही मतभेद काहीच नव्हता, परंतु एका केवळ तात्विक परंतु अत्यंत महत्त्वाच्या मुद्दयावर अचानक मतभेद निघाला.  परकीय राष्ट्राशी युध्दप्रसंग उद्‍भवला तरीसुध्दा आपले अहिंसेचे मूलतत्त्व सोडून देणे गांधीजींना अशक्य झाले.  हा युध्दाचा प्रसंग म्हणजेच आपल्या अहिंसातत्त्वाला आव्हान आहे, हीच आपल्या श्रध्देच्या कसोटीची वेळ आहे असे गांधीजींना वाटे.  ह्या कसोटीच्या प्रसंगी आपण शुध्द अहिंसाव्रत पाळले नाही तर एकतर अहिंसा म्हणजेच सर्वव्यापी मूलभूत तत्त्व व प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा मार्ग आहे ही जी आपली श्रध्दा ती चुकीची आहे, नाहीतर ते तत्त्व तसे स्वयंभू असले तर ते सोडून देणे किंवा त्या तत्त्वाला मुरड घालणे म्हणजे आपला अध:पात होतो, अशी गांधीजींची विचारसरणी होती.  ज्या तत्त्वावर त्यांनी जन्मभर श्रध्दा ठेवली व ज्या तत्त्वाच्या आधारावर त्यांनी त्यांच्या सार्‍या चळवळी चालवल्या ते तत्त्व त्यांना सोडवेना व म्हणून त्या अहिंसातत्त्वावरून जे काही सिध्दान्त निघतील, त्याप्रमाणे वागले तर जे काही परिणाम होतील ते आपण स्वीकारले पाहिजेत असे त्यांना वाटे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel