याचा अर्थ असा की युध्दोपयोगी सामानाकरता युध्दकाळात दिलेली ही प्रचंड कंत्राटे म्हणजे काही हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांचा एकंदरीत नेहमीचा उत्कर्ष नव्हे, झाले ते इतकेच की, नेहमीच्या वस्तूंच्या उत्पादनाऐवजी युध्दाच्या उपयोगी पडणार्‍या सामानाचे उत्पादन होऊ लागले व उत्पादनाचा मोठा ओघ त्या युध्दकार्याकडे वळला.  या कंत्राटांमुळे तात्कालिन युध्दाची गरज भागली, पण त्यामुळे लष्कराबाहेरच्या सामान्य जनतेला लागणार्‍या सामानाचे उत्पादन भयंकर घटले.  याचे अर्थातच फार दूरवर पोचणार परिणाम झाले.  हिंदुस्थान देशाला विलायत सरकारकडून मिळावयाच्या रकमेची स्टर्लिंग जमाबाकी लंडनमध्ये फुगत राहिली व हिंदुस्थानात काही थोड्या लोकांच्या हातात द्रव्यसंचय एकत्र होऊ लागला, पण सबंध देशाच्या दृष्टीने पाहिले तर अत्यंत निकडीच्या नित्योपयोगी वस्तू भलत्या दुर्मिळ झाल्या, कागदी नोटांचा भयंकर प्रसार जिकडे तिकडे होऊन तो वाढतच गेला व मालाच्या किमती भरमसाठ वाढता वाढता केव्हा केव्हा कल्पनातील प्रचंड आकड्यावर जाऊ लागल्या.  १९४२ सालचे पहिले सहा महिने लोटले नाहीत तोच अन्नाबाबत बिकट प्रसंग येणार हे स्पष्ट दिसू लागले; १९४३ च्या शरद् ॠतूच्या सुमारास बंगालमध्ये व इतर प्रांतांतून दुष्काळाने कैक दशलक्ष लोक मेले. युध्द व युध्दाच्या बाबतीत सरकारी धोरण यांचा भार, तो सहन करण्यास अत्यंयत असमर्थ असलेल्या कोट्यवधी दुबळ्या जनतेवर पडून त्या भाराने चिरडून जाऊन उपासमारीने हळूहळू झिजत जाऊन क्रूरातले क्रूर मरण अनंत लोकांच्या कपाळी आले.

मी दिलेले वरचे आकडे फक्त १९४२ अखेरचे आहेत; त्यानंतरचे आकडे मजजवळ नाहीत. १९४२ नंतर पुष्कळसा फरक पडला असण्याचा संभव आहे व उद्योंगधंद्यांच्या व्यापाचा चिन्हांक आता कदाचित अधिकही झाला असेल.*
-----------------------
*  तो अधिक झालेला नाही.  कलकत्त्याचे 'कॅपिटल' हे एक नियतकालिक आहे त्याच्या ता. ९/३/१९४४ च्या अंकात हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांचे चिन्हांक पुढे दिलेल्याप्रमाणे आलेले आहेत :
(१९३५-३६=१००) १९३८-३९ : १११.१.  १९३९-४० : ११४.०.
१९४०-४१ : ११७.३.  १९४१-४२ : ११२.७.  १९४२-४३ : १०८.८.
१९४३-४४ : १०८.० (सरासरी).  जानेवारी १९४४ : १११.७

परंतु ह्या आकड्यांच्या साहाय्याने जे चित्र दिसते, त्यात मुख्यत: विशेष असा काहीही बदल घडलेला नाही.  पूर्वीचीच पध्दत अद्याप पुढे चालू आहे, पूर्वीसारखेच आणीबाणीचे प्रसंग येत आहेतच, तीच ती ठिगळे लावणे, तेच जुजबी उपास चालले आहेत, सर्वव्यापी धोरण किंवा योजना अजूनही नाही.  ब्रिटिश उद्योगधंद्यांचे चालू काळात व भविष्य काळात चांगले कसे चालेल याची चिंता आजही हिंदुस्थान सरकारला वाटत आहे- आणि हे एकीकडे अव्याहत चालले असताना दुसरीकडे या देशातले लोक अन्न नाही म्हणून किंवा साथीच्या रोगाने सारखे मृत्युमुखी पडत आहेत.

सध्या चालू असलेले या देशातले उद्योगधंदे, विशेषत: कापड, लोखंड व पोलाद व तागाच्या गिरण्या या धंद्यांची खूपच भरभराट झाली आहे.  जादा नफ्यावर भारी दराचा कर बसलेला असतानासुध्दा उद्योगपती, युध्देपयोगी कंत्राटे घेणारे, साठेबाजी व नफेबाजी करणारे यांच्यात नवकोट नारायण बनलेल्यांची संख्या वाढली आहे व हिंदुस्थानातील जनतेच्या वरच्या आर्थिक वर्गाच्या हातांत मोठ्यामोठ्या रकमा गोळा झाल्या आहेत.  पण कामगारवर्गाला एकंदरीत पाहिले तर विशेष काही लाभ झालेला नाही.  कामगारांचे प्रसिध्द पुढारी श्री. ना. म. जोशी यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात आपल्या भाषणात असे जाहीर केले की, युध्दाच्या काळात हिंदुस्थानात कामाची परिस्थिती अधिक वाईट झाली आहे.  जमिनीचे मालक व मध्यम स्थितीतील शेतकरी, विशेषत: पंजाब व सिंधमधील हे वर्ग, यांची भरभराट झाली आहे, परंतु शेतीवर उपजीविका करणार्‍या सामान्य लोकांपैकी बहुतेक सार्‍यांना युध्दपरिस्थितीचा चांगलाच तडाखा बसलेला असून त्यांचे फार हाल झाले आहेत. सर्वसाधारणपणे गिर्‍हाइकवर्ग घेतला तर चलनवाढ व किंमतीची वाढ यामुळे तो वर्ग भरडला जाऊन त्याचे पीठ पडले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel