अल्पसंख्याकांचा प्रश्न : मुस्लिम लीग : जनाब जिना
गेल्या सात वर्षांतील मुस्लिम लीगची संघटित वाढ अपूर्व आहे, आश्चर्यकारक आहे.  राष्ट्रसभेपासून मुसलमानांच्या नवीन पिढीला दूर ठेवण्यासाठी म्हणून ब्रिटिशांच्याच प्रेरणेने १९०६ साली मुस्लिम लीग जन्माला आली.  लहानशा वरिष्ठ वर्गाची ती संस्था होती, सरंजामशाही वृत्तीच्या लोकांचा तिच्यावर ताबा होता.  बहुजन मुस्लिम समाजावर तिचे वजन नव्हते.  सर्वसाधारण मुसलमान जनतेस तिचे नावगावही माहीत नव्हते.  तिची घटनाच अशी होती की, लहानशा वर्तुळातच ती राहावी, आणि नेतृत्वाची मिरासदारी राहावी.  असे असूनही परिस्थितीमुळे आणि मुसलमानांतील वर्धिष्णू मध्यम वर्गामुळे, खिलाफतीमुळे आणि मुसलमानांच्या पवित्र स्थळांच्या प्रश्नामुळे हिंदी मुसलमानांवर जबरदस्त परिणाम झाला आणि ते पराकाष्ठेचे ब्रिटिशद्वेषी झाले.  या जागृत आणि प्रक्षुब्ध बहुजनसमाजाला मुस्लिम लीग मार्गदर्शनही करू शकत नव्हती,  नेतृत्वही देऊ शकत नव्हती.  लीग खरोखर गोंधळून गेली आणि जवळजवळ अस्तंगत झाली.  राष्ट्रसभेशी दृढ सहकार्य करणारी खिलाफत कमिटी ही नवीनच मुसलमानी संघटना उभी राहिली. राष्ट्रसभेतही पुष्कळ मुसलमान आले आणि तिच्या द्वारा काम करू लागले.  १९२०-२३ या काळातील असहकाराची पहिली चळवळ ओसरल्यावर पुढे खिलाफत कमिटीही जवळजवळ नामशेष झाली.  कारण ज्या तुर्की खिलाफतीसाठी ही चळवळ सुरू झाली ती तुर्की खिलाफतच रद्द करण्यात आली.  राजकीय चळवळीपासून बहुजन मुसलमान समाज आणि काही अंशी हिंदूची दूर निघून गेले.  तरीही बरेचसे मुसलमान विशेषत: मध्यमवर्गीय राष्ट्रसभेत होते आणि काम करीत होते.

या काळात छोट्या मोठ्या अनेक मुस्लिम संघटना अस्तित्वात आल्या.  लहर येईल तेव्हा त्याकाम करीत,  पुष्कळदा आपसातच त्यांचे खटके उडत.  बहुजनसमाजाशी त्यांचा संबंध नसे, आणि ब्रिटिश सरकार देईल तेवढेच त्यांचे राजकीय महत्त्व.  विधिमंडळांतून आणि नोकर्‍याचाकर्‍यांतून मुसलमानांसाठी विशेष सवलतीची, संरक्षणाची मागणी करणे एवढेच त्यांचे मुख्य काम असे.  या रीतीने मुसलमानांचा एक विशिष्ट दृष्टिकोण ते दाखवीत यात संशय नाही.  हिंदू शिक्षणात आणि उद्योगधंद्यांत पुढारलेले होते.  हिंदूंची संख्याही अधिक.  यामुळे मुसलमानांना भीती वाटे.  रागही येई.  जिनासाहेब हिंदी राजकारणातून निवृत्त होऊन, हिंदुस्थानचा किनारा सोडून इंग्लंडमध्ये जाऊन राहिले होते.

१९३० मध्ये सविनय कायदेभंगाची दुसरी मोठी चळवळ आली.  मुसलमानांनीही या चळवळीत साथ दिली. परंतु १९२०-२३ काळातल्या इतकी नव्हती.  या चळवळीच्या निमित्ताने तुरुंगात गेलेले कमीत कमी दहा हजार तरी मुसलमान होते.  सरहद्द प्रांताने विशेषच कामगिरी केली.  या प्रांतात ९५ टक्के मुसलमान लोक आहेत.  या प्रांतातील पठाणांचे खान अब्दुल गफान खान हे आवडते व अव्दितीय असे पुढारी आहेत.  त्यांच्या कार्यामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे सरहद्दप्रांत १९३० च्या लढ्यात आघाडीवर होता.  अलीकडच्याकाळात हिंदुस्थानात ज्या अनेक विलक्षण गोष्टी घडल्या, त्यांत सरहद्दप्रांतातील तुफानी आणि बंडखोर वृत्तीच्या पठाणांनी ज्यात अपार क्लेश आणि छळ भोगावा लागला असा अहिंसात्मक प्रतिकाराचा मार्ग उचलावा ही गोष्ट डोळ्यांत भरण्यासारखी आहे.  खान अब्दुल गफार खानांनी पठाणांना राजकारणात हा मार्ग अवलंबायला लावले हे खरोखर आश्चर्य आहे.  पठाण सत्याग्रहींना खरोखरच १९३० साली अग्निदिव्याहून जावे लागले.  त्यांच्यावर झालेल्या जुलमाला सीमा नव्हती.  त्या वेळच्या कटू आठवणी अद्याप आहेत.  ते व्रण बुजले नाहीत.  परंतु इतका छळ होत असतानाही सरकारी शक्तीविरुध्द, छळणार्‍या लोकांविरुध्द एकही अत्याचारी कृत्य पठाणांनी केले नाही इतकी त्यांची शिस्त होती, इतका त्यांचा संयम होता.  आणि भावापेक्षाही पठाणाला बंदुक प्रिय असते, तो पटकन् चिडतो, प्रक्षुब्ध होतो, जसा घुस्सा येताच हाणायची ज्याला सवय आणि ही ज्याची प्रसिध्दी अशा पठाणाने अशी शिस्त आणि संयम दाखवावीत ही खरोखर एक चमत्कृती आहे, महान आश्चर्य आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel