हिंदी माल उत्कृष्ट असे आणि युरोप त्याचे मोठे गिर्‍हाईक असे म्हणून तर साहसी नाव काढू पाहणारे लोक प्रथम या देशाकडे वळले.  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले पहिले काम हिंदी माल नेऊन युरोपात विकणे हेच होते, आणि हा धंदा चांगलाच किफायतशीर असल्यामुळे कल्पनातीत नफा वाटला जाई.  इंग्लंडमध्ये उत्पादनाची नवीन उच्च तंत्रे वापरण्यात येऊ लागली तरीही हिंदी कलावंतांचे व कारागिरांचे कसबही इतके अपूर्व होते.  इंग्लंडमध्ये प्रचंड यंत्रयुग सुरू झाले तरीही हिंदी मालाचा पूर इंग्लंडमध्ये येतच होता.  कायद्याने भरमसाट जकाती बसवून आणि काही काही बाबतीत तर प्रत्यक्ष बंदी घालून हिंदी माल इंग्रजांना बंद करावा लागला.

प्लासीच्या लढाईचे जे वर्ष, त्याच वर्षी १७५७ साली क्लाईव्हने मुर्शिदाबादचे पुढील प्रमाणे वर्णन केले आहे.  ''लंडन इतकेच हे शहर विस्तृत, घनदाट, आणि श्रीमंत आहे.  फरक इतकाच की लंडनमधील लोकांजवळ जी काही मालमत्ता असेल, तिच्याहून अनंत पटींनी अधिक मालमत्ता जवळ असलेले येथे कितीतरी लोक आहेत.''  पूर्व बंगालमधील डाक्का शहर मलमलीसाठी प्रसिध्द होते.  ही दोन्ही शहरे महत्त्वाची असली तरी हिंदुस्थानच्या जवळजवळ एका बाजूला, पूर्व टोकाला होती.  सर्व देशभर याहून मोठी अशी कितीतरी शहरे होती, प्रचंड व्यापाराची, अवाढव्य देवघेवींची मोठमोठी केंद्रे ठायी ठायी होती.  बातम्या पोचविण्याची, किंमती, भाव कळविण्याची शीघ्रगामी परंतु कार्यक्षम पध्दती त्यांनी निर्माण केलेली होती.  ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍यांना अधिकृत अहवाल पोचण्यापूर्वीच सर्व बातम्या लढाईच्याही- मोठमोठ्या औद्योगिक केंद्रांना, मोठमोठ्या पेढ्यांना आधी येऊन मिळत.  औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी जितकी वाढ होणे शक्य, जितकी प्रगती करणे शक्य तितकी येथे झाली होती.  आर्थिक वाढींची बीजे तिच्यात होती की नाही, किंवा प्रगतिहिन सामाजिक रचनेशी तीही पक्की जखडलेली होती की काय ते सांगणे कठीण आहे.  परंतु असे वाटते की, अडथळे न येते, उत्पात न होते, अघटित घटना न होत्या, तर नवीन औद्योगिक परिस्थितीशी हिंदी उद्योगधंद्याने आपल्या विशिष्ट पध्दतीनुसार जुळवून घेतले असते, स्वत:त फरक करून घेतले असते.  हिंदी उत्पादनपध्दती इतकी परिपक्व झाली होती की, तिच्यात काही बदल झालाच पाहिजे होता, परंतु तो बदल व्हायलाही तिच्यातच क्रांती होण्याची जरूर होती.  तो फरक घडवून आणायला कोणातरी त्रयस्थाची कदाचित जरूर असेल.  औद्योगिक क्रांतीपूर्व काळात हिंदी आर्थिक व्यवस्था कितीही परिपूर्ण आणि परिणत झालेली असती तरी औद्योगिक क्रांती झालेल्या देशातील उत्पादनाशी तिला फार दिवस टक्कर देता आली नसती.  स्वत:च्या देशात औद्योगिक क्रांती करून घेणे भाग होते, नाहीतर परदेशी आर्थिक व्यवस्था मान्य करावी लागली असती; म्हणजेच पुढे राजकीय भानगडींना तोंड द्यावे लागले असते.  परंतु झाले असे की, हिंदुस्थानात आधी राजकीय प्रभुत्व आले आणि त्यामुळे तेव्हापर्यंत उभारलेली आर्थिक व्यवस्था झपाट्याने नष्ट झाली.  तिच्या ऐवजी नवीन निर्मिती मात्र झाली नाही.  जुने गेले आणि नवे मात्र मिळाले नाही.  ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांच्या राज्यसत्तेची, त्याचप्रमाणे त्यांच्या भांडवलदारांच्या आर्थिक सत्तेची दोहोंची प्रतिनिधी होती.  ती सार्वभौम होती, आणि व्यापार्‍यांची कंपनी असल्यामुळे पैसा हे तर तिचे मुख्य ध्येय होते. ईस्ट इंडिया कंपनी आश्चर्यकारक गतीने कल्पनातीत पैसा मिळवीत असतानाच, अ‍ॅडम स्थिम या अर्थशास्त्रज्ञाने 'राष्ट्रांची संपत्ती' या आपल्या ग्रंथात १७५६ मध्ये पुढीलप्रमाणे लिहिले आहे, ''एखाद्या देशाचा राज्यकारभार केवळ बनियेगिरी करणार्‍या व्यापार्‍यांच्या कंपनीच्या हाती असणे म्हणजे दुर्दैव होय.  सर्वात वाईट असा तो राज्यकारभार असणार.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel